डॉक्टरांनी कोरोना उपचारामध्ये औषधांचा अनाठायी वापर टाळावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई : कोरोनाबाधितांच्या उपचारांमध्ये डॉक्टरांनी औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा. या औषधांच्या अतिरेकीमुळे त्याचे दुष्परिणाम रुग्णांवर होत असल्याचे समोर येत आहे. याच गोष्टींमुळे म्युकरमायकोसीस सारखा आजार होत असल्यामुळे रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनी या गोष्टी ध्यानात ठेवाव्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असली, तरी धोका अद्याप कायम आहे. आता तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मेडिकल एज्युकेशन विभागाचे डायरेक्टर डॉ. तात्याराव लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री कोरोना रुग्णांवर उपचार करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक सकारात्मक बदल झाला आहे. कोरोनाची मागील वर्षी प्रचंड दहशत होती. रुग्णालय उघडायला डॉक्टर्ससुद्धा तयार नव्हते. त्यावेळी बेसिक गोष्टींचा आपल्याकडे तुटवडा होता. पण ही दहशत आता यावर्षी खूप कमी झाली आहे. जवळपास सर्वच डॉक्टरांनी आपले क्लिनिक उघडले आहेत. यावरुन आपण माझा डॉक्टर माझी जबाबदारी अशी संकल्पना आणली होती. यानुसार आता अनेक फॅमिली डॉक्टर कोरोना विरोधात मैदानात उतरले आहे.

आपण लॉकडाऊन उघडायचा की नाही यावर निर्णय घेणार आहे. पण, हा निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा परिस्थिती थोडी वेगळी आहे. यावेळी कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झाले असल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. आता पावसाळा येत असल्यामुळे अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण, पावसाळी आजार आणि कोरोना यांच्या लक्षणांमध्ये बरेच साध्यर्म आहे. कोरोना रुग्णांना वेळीच उपचार देणे गरजेचे आहे.

कोरोना उपचारांमध्ये डॉक्टरांनी औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा. या औषधांच्या अतिरेकीमुळे याचे दुष्परिणाम रुग्णांवर समोर येताना दिसत आहे. याच गोष्टींमुळे म्युकरमायकोसीस सारखा आजार होत असल्यामुळे रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनी या गोष्टींचा विचार करायला हवा. यात कोरोनाबाधित रुग्ण लवकरात लवकर ओळखून त्याला उपचार देणे महत्वाचे आहे. या गोष्टींची घरी उपचार करताना जास्त काळजी घेणे महत्वाचे आहे.

कोरोनाबाधित व्यक्ती तुमच्याकडे आली, तर त्याने लस घेतली आहे का? घेतली असेल तर कोणती होती? याची माहिती आपल्याकडे ठेवा. कारण, कोणती लस किती प्रभावी आहे, याची माहिती आपल्याला मिळेल. भविष्यात 100 वर्षानंतर असा आजार आला तर हा डेटा खूप उपयुक्त ठरणार आहे. रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत का? किती प्रमाणात तयार झाल्या आहेत? याची माहितीही आपल्याकडे असायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे.