अमुलला ‘शाकाहारी दूध’ बनवण्याचा पेटाकडून सल्ला, त्याला अमूलने दिले हे उत्तर


मुंबई : प्राण्यांचे संरक्षण करणारी संस्था पेटा इंडियाने भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूल कंपनीला दिलेला सल्ला सध्या चर्चेचा विषय बनला आहे. भारतातील सर्वात मोठ्या सहकारी तत्त्वावरील दूध उत्पादक कंपनीला पेटा म्हणजेच पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स या संस्थेने एक अजब सल्ला दिला आहे. आता गाईच्या दुधाच्या ऐवजी शाकाहारी दूध उत्पादनाकडे अमूल या कंपनीने आपले लक्ष वळावे, त्यातच भविष्य असल्याचे पेटाने एका पत्राद्वारे अमूल कंपनीला कळवले आहे. पण यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

पण पेटाने दिलेल्या या सल्ल्याचा अमूल कंपनीच्या सीईओ आर एस सोढी यांनी विरोध केला आहे. जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक अश्विनी महाजन यांनी केलेल्या ट्विटला रिट्विट करत सोढी यांनी आपला पाठिंबा दिला आहे. सोढी म्हणतात, जर अमुल कंपनीने गाईच्या दुधाचे उत्पादन थांबवले तर भारतातील 10 कोटी शेतकऱ्यांना रोजगार कोण देणार? आपल्याला माहिती नाही का बहुतेक दूधउत्पादक शेतकरी भूमिहीन असतात. त्यांचे उपजीविकेचे एकमेव साधन आपल्या सल्यामुळे नष्ट होईल. आपल्या परंपरेतच दुधाचा वापर असल्यामुळे शाकाहारी दुधाच्या मागे लागणे योग्य नाही.

पेटा इंडियाने देखील अमूल कंपनीच्या प्रतिक्रियेवर उत्तर दिले आहे. शाकाहारी दुधाकडे मिळाल्यास शेतकऱ्यांचे रोजगार जाणार नाहीत, तर उलट यामुळे प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबतील आणि दुधापासून आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम देखील होणार नाहीत.

दूध उत्पादनात देशातील एक अग्रेसर राज्य महाराष्ट्र मानले जाते. 2020 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दिवसाला एक कोटी 40 लाख लिटर एवढ्या दुधाचे उत्पादन होते. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या 2018-19च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 11 हजार 655 टन एवढे वार्षिक दूध उत्पादन केले जाते. त्यामुळे दूध उत्पादनावर अवलंबून असणारे शेतकरी देखील लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहेत. त्यांना मात्र हा सल्ला मुळीच पटलेला नाही.

सध्या जगात शाकाहारी दुधाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. नारळ काजू बदाम आणि मुख्यतः सोया पासून शाकाहारी दूध बनवले जाते. सध्या या दुधाला बाजारात अनेक नागरिक पसंती देत आहेत. गाईच्या दुधापेक्षा शाकाहारी दूध हे जास्त फायदेशीर असते, असा दावा देखील पेटा इंडियाने केला आहे. जरी अमूल इंडिया कंपनीने पेटा इंडियाने दिलेला सल्ला धुडकावून लावला असला तरी, यावर चर्चा तर होणारच आहे. गायीला देवी म्हणून पूजा करणाऱ्या भारतात तिच्यापासून मिळालेले दूध प्रसाद म्हणून पिण्याची परंपरा आहे. मग असा भारत बदलेल का? असा सवाल आहे.