भारतीय वंशाच्या डॉक्टरचा दावा; ‘या’ सूचनांचे पालन केले तर 1 जुलैला संपणार कोरोना


मुंबई : भारतीय वंशाचे अमेरिकेतील पेनिसेल्वेनियात डॉक्टर असलेल्या रवी गोडसेंनी आपण सांगितलेल्या पाच गोष्टींची अंमलबजावणी केली, तर एक जुलैला भारतातून कोरोना संपेल आणि लोकांना मास्कचा वापर करावा लागणार नाही. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा काही धोका नसल्याचा दावा केला आहे.


ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून डॉ. रवी गोडसे हे ओळखले जातात. त्यांनी या आधीही कोरोना संबंधी व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक सूचना केल्या आहेत. त्यांनी आता भारत सरकारसाठी पाच सूचना केल्या आहेत. त्यांचे जर पालन केले, तर येत्या 1 जुलैपर्यंत भारतातील कोरोना संपेल, ऑक्टोबरपर्यंत लोकांना मास्क वापरायची गरज भासणार नाही, तर भारतात कोरोनाची तिसरी लाटच येणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कोरोनाची तिसरी लाट देशभर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर डॉ. रवी गोडसे म्हणाले की, जरी कोरोनाची तिसरी लाट आली नाही, तरी लहान मुलांना थोडासा धोका आहेच. आतापर्यंत घरी बसलेली मुले अचानक ग्राऊंडवर खेळायला गेली, तर त्यांना कमी असेना पण काही प्रमाणात धोका असल्याचे गोडसे यांनी म्हटले आहे.


कोणत्या पाच सूचना डॉ. रवी गोडसे यांनी केल्या आहेत

  • जनतेला कोरोनाबद्दल दररोज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती द्या.
  • मंजुरीच्या प्रतिक्षेत जेवढ्या काही लसी आहेत त्या सर्वांच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्या.
  • लसीकरण असेल वा कोरोनाचे उपचार, खासगी क्षेत्रालाही त्याची परवानगी द्या. त्यामुळे गती वाढेल.
  • मोनोक्लोनल प्रक्रियेला प्रोटोकॉलनुसार परवानगी द्या. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल. गेल्या वर्षीच अमेरिकेत मोनोक्लोनलला परवानगी देण्यात आली आहे.
  • लाल फितीचा कारभार बंद करा आणि सर्वांचे लसीकरण करा.

जर या दिलेल्या तारखा खोट्या ठरवायच्या नसतील, तर या सूचनांचे लगेच पालन करा, असेही डॉ. रवी गोडसे म्हणाले आहेत.