राज्य सरकारच्या प्रत्येक खात्यातील भ्रष्टाचार उघड करणार – नारायण राणे


मुंबई : मुख्यमंत्र्यांनी कोकणाच्या विकासासाठी काय दिले? दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांनी पॅकेज का जाहीर केले नाही? असा सवाल करत नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नुसता फेरफटका आणि ‘नौटंकी दौरा असल्याचे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचार सुरु असून तो पुराव्यानिशी समोर आणेन, असा इशाराही त्यांनी दिला.

कोकणचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, पण त्यांनी त्यासाठी किती वेळ दिला, असा सवाल करत नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी केवळ तीन तासाच्या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पण या वादळात किती लोकांचे नुकसान झाले, किती जणांचे रोजगार गेले याची माहिती लोकांकडून घेतली नाही. लोकांची भेट मुख्यमंत्र्यानी का घेतली नाही? दोन दिवसांत पॅकेज मुख्यमंत्र्यांनी का जाहीर केले नाही? असा सवाल करत त्यांच्या आश्वासनामध्ये स्पष्टता नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे म्हणाले की, कोकणाला मुख्यमंत्र्यांनी काय दिले, एक तरी प्रकल्प दिला का? पर्यटनासाठी काय दिले, किती विकास केला हे सांगावे. भावनिक विषयावर गोड-गोड बोलून कोकणची फसवणूक केली जात आहे.

दरम्यान राज्याच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार सुरु असून आपण तो लवकरच उघड करणार असल्याचे नारायण राणे म्हणाले. केवळ टक्केवारीसाठी मंत्रालयात काम चालत असल्याचे सांगत नारायण राणे म्हणाले की, कोरोनाच्या औषधांच्या टेंडरमध्ये पैसे खाल्ले जात आहेत. संजय राऊतांनी हे जाहीर करावे अन्यथा मी जाहीर करेन. पोलीस वसाहतीच्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार झाला असून प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार नावानिशी उघड करणार आहे. सरकारच्या तिजोरीत लोकांना देण्यासारखे काहीच नसल्याचे सांगत नारायण राणे म्हणाले की, जनाची नाही आणि मनाचीही नाही, असे हे सरकार आहे.