ओडिशाच्या किनाऱ्यावर लँडफॉल झाल्यानंतर यास चक्रीवादळाचा झारखंडच्या दिशेने प्रवास


नवी दिल्ली – यास चक्रीवादळाचा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणाऱ्या धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान तडाखा बसला. तब्बल १२० ते १४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनिशी या भागामध्ये हे चक्रीवादळ धडकल्यामुळे किनारीभागात असणाऱ्या घरांचे आणि नागरी सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, भारतीय नौदल अशा सर्व यंत्रणा बचावकार्य करण्यामध्ये आघाडीवर आहेत.

या पार्श्वभूमीवर लँडफॉल झाल्यानंतर झारखंडच्या दिशेने यास चक्रीवादळाने आपला मोर्चा वळवला असल्यामुळे आत्तापर्यंत समुद्रात असणारे हे चक्रीवादळ आता पूर्णपणे जमिनीवर आले आहे. यापुढच्या प्रवासात वादळाचा वेग आणि तीव्रता हळूहळू कमी होत जाणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दुपारी अडीचच्या सुमारास यास चक्रीवादळाने त्याची लँडफॉलची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पण, या भागामध्ये उद्या दुपारपर्यंत पाऊस राहणार आहे. उद्या म्हणजेच २७ मे रोजी सकाळपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. कारण समुद्र या काळात खवळलेला असेल, अशी माहिती भुवनेश्वर वेधशाळेतील ज्येष्ठ वैज्ञानिक उमाशंकर दास यांनी दिली आहे.

बंगालच्या उपसागरात अंदमान-निकोबार बेटांच्या उत्तरेकडे या महिन्याच्या २१ मे पासूनच चक्रीवादळासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ लागले होते. २४ मे रोजी वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला. मंगळवारी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचे चक्रीवादळात रुपांतर झाले. उत्तर ओडिशाच्या किनाऱ्यावरील धामरा आणि बालासोर यांच्यामध्ये या चक्रीवादळाचा बुधवारी म्हणजे २६ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास लँडफॉल झाला. यावेळी किनारी भागात तब्बल १२० ते १४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. ओडिशासोबतच पश्चिम बंगालच्या किनारी भागातल्या इस्ट मिदनापूर आणि साऊथ २४ परगणा या भागांना देखील वादळाचा तडाखा बसला. मात्र, तोपर्यंत चक्रीवादळाचा वेग ताशी ९० किलोमीटर एवढा झाला होता.

दरम्यान, यास चक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात थैमान घातल्यानंतर आता झारखंडच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. या तिन्ही राज्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिवसभरात सुमारे १२ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पण, आता झारखंडला हाय अलर्ट देण्यात आला आहे.

यास चक्रीवादळाला ओडिशा आणि पश्चिम बंगालमधून झारखंडमध्ये प्रवेश करण्यासाठी बुधवार मध्यरात्रीपर्यंतचा वेळ लागेल. या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. संध्याकाळपर्यंत वाऱ्याचा वेग काही प्रमाणात कमी झालेला असेल, अशी माहिती वेधशाळेकडून देण्यात आली आहे. लँडफॉल झाल्यानंतर वादळाने उत्तर आणि उत्तर-पश्चिम असा प्रवास सुरू केला आहे.