कोरोनाविरुद्धची देशाची लढाई मोदींच्या विज्ञानासंदर्भातील अनास्थेमुळे आणखीन खडतर झाली


नवी दिल्ली – भारताची कोरोनाविरोधातील लढाई केंद्र सरकार आणि मोदींच्या हिंदुत्वावादी विचारसरणीमुळे आणखीन कठीण झाल्याचा दावा इतिहासकार आणि राजकीय क्षेत्रातील जाणकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामचंद्र गुहा यांनी केला आहे. सध्याची कोरोना परिस्थिती हाताळताना मोदी सरकारने केलेल्या चुकांचा पाढा एका लेखामधून गुहा यांनी वाचला आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपने धार्मिक मेळ्याला दिलेली परवानगीच कारणीभूत असल्याचे द स्क्रोलसाठी लिहिलेल्या लेखामध्ये गुहा यांनी म्हटले आहे. कोरोनाविरुद्धचा लढा वैज्ञानिक दृष्टीकोनामधून लढण्याऐवजी केंद्राने आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर हिंदुत्ववादी भूमिकेला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याचा युक्तीवाद गुहा यांनी केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव उत्तरेकडील राज्यांमध्ये कुंभ मेळ्याच्या आयोजनासाठी परवानगी दिल्याने अधिक झाल्याचे गुहा यांनी लेखात म्हटले आहे. एकीकडे असंख्य लोकांवर अंत्यसंस्कार केले जात असताना आणि मृतदेह नद्यांमध्ये तरंगत असताना किंवा वाळूमध्ये पुरले जात असतानाच दुसरीकडे केंद्र सरकारने आणि भाजपाची सत्ता असणाऱ्या स्थानिक राज्य सरकारने कुंभ मेळ्याच्या आयोजनाला परवानगी दिली.

या मेळ्याचे आयोजन करण्यापासून रोखण्यासंदर्भातील पावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक प्रभावशाली व्यक्तींना उचलता आली असती. पण त्यांनी तसे केले नाही, कारण त्यांना त्यांची श्रद्धा आणि फाजील धर्माभिमान हा विज्ञानापेक्षा अधिक महत्वाचा वाटला, असे गुहा यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

कोरोनाची लाट येण्याच्या अनेक महिने आधी गुहा यांनी लिहिलेल्या एका स्वत:च्या जुन्या लेखाचा संदर्भही दिला आहे. विज्ञानाबद्दल केंद्र सरकार आणि भाजपला फारसे प्रेम वाटत नसल्याचे गुहा म्हणाले आहेत. कशापद्धतीने मोदी सरकार विज्ञानाचा तिरस्कार करते आणि वैज्ञानिक संशोधनातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये राजकारण कसे घडवून आणते याबद्दल मी लिहिले होते.

मी २०१९ साली एप्रिलमध्ये लिहिलेल्या लेखात देशातील सामाजिक आणि आर्थिक भविष्यासंदर्भातील गांभीर्य मोदी सरकारने ठेवलेले नाही. सरकारच्या या रानटी, निर्दयी आणि बुद्धीवाद्यांविरोधच्या धोरणांचा परिणाम भारतीयांना आणि भावी पिढ्यांना सहन करावा लागणार असल्याचे म्हटले होते. आता तसेच घडत आहे. आजही अशाच पद्धतीने सरकार वागत आहे. या धोरणांमुळे देशाचे भविष्य धुसर होत असल्याचे दिसत आहे. आधीच या कोरोनाच्या साथीमुळे देशातील जनतेसमोर अनेक संकट उभी असतानाच विज्ञानाबद्दल केंद्र सरकारला आणि सत्ताधारी पक्षाला फारशी आस्था नसल्यामुळे ही लढाई आणखीन खडतर झाली असल्याचे गुहा म्हणाले आहेत.

गुहा यांनी योगगुरु बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीसंदर्भात केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या लेखात मागील काही महिन्यांपासून कशाप्रकारे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी औषधोपचार आणि इतर प्रकारे हिंदुत्ववादाला प्रोत्साहन देण्यात आले, यासंदर्भात भाष्य केले आहे. अगदी गोमुत्र, शेणाचा लेप अंगावर लावून गुजरातमध्ये केल्या जाणाऱ्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या प्रयोगापासून ते हवन करण्यासंदर्भात मध्य प्रदेशमधील महिला मंत्र्याने केलेल्या वक्तव्यासंदर्भातील दाखला गुहा यांनी दिला आहे.

माझा आयुर्वेदाला विरोध नसल्याचेही गुहा यांनी या लेखात म्हटले आहे. माझा आयुर्वेदाला विरोध नाही. त्याचे फायदे मी स्वत: अनुभवले आहेत. पण कोरोना हा २१ व्या शतकातील विषाणू आहे. आयुर्वेद, योग, युनानी आणि होमिओपॅथीसारख्या उपचारपद्धतींचा शोध लागला, तेव्हा हा विषाणू अस्तित्वात नव्हता. हा विषाणू केवळ एक वर्ष जुना आहे. कडुनिंबाच्या पानांचा धूर करणे किंवा गोमुत्र प्यायल्याने किंवा वनस्पतींपासून बनवलेल्या गोळ्या खालल्याने, अंगावर शेणाचा लेप लावल्याने किंवा नाकामध्ये नारळाचे तेल टाकल्याने या विषाणूवर मात करता येते याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. उलट यासर्वांमुळे संसर्ग झाला असेल, तर त्यातून बरे होण्यासाठी अधिक काळ लागतो, असे गुहा यांनी म्हटले आहे.