टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथील करण्याची योजना आखत आहे ठाकरे सरकार!


मुंबई – राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्यामुळे राज्यात ठाकरे सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. १ जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान दुसरी लाट ओसरली असून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्यामुळे ठाकरे सरकारकडून लॉकडाऊन शिथील केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. दरम्यान लॉकडाऊन ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करण्याची योजना आखत असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

तयारीचा आपण आढावा घेणार असून जर सर्व गोष्टी सकारात्मक असतील तरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करत निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करु शकतात. निर्बंध पूर्णपणे उठवले जातील, या भ्रमात राहू नका, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन उठवण्याची तयारी सरकारकडून सुरु झाली असून ३० मेपर्यंत सर्व गोष्टी पार पडतील. निर्बंध शिथील करण्यास नेमकी कधीपासून सुरुवात होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तिसऱ्या लाटेची भीती असल्याने निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार नाहीत, मात्र काही प्रमाणात शिथिलता दिली जाऊ शकते.

अशा प्रकारे उठवला जाऊ शकतो लॉकडाऊन – पहिल्या टप्प्यात दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात दैनंदिन गरजांशी संबंधित अन्य काही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. ही दुकाने पर्यायी दिवसांवर उघडण्यास परवानगी दिली जाईल. तसेच तिसऱ्या टप्प्यात हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, दारुच्या दुकानांना निर्बंधासह सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येऊ शकते, तर हॉटेल्सना ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. तर चौथ्या टप्प्यात मुंबई लोकल, धार्मिक स्थळे, जिल्हाबंदी पुढे ढकलली जाऊ शकते.

दरम्यान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान येण्याची शक्यता आहे. अनलॉक करण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक गोष्टींची चाचपणी केली जाणार आहे. पण जर कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आणि हव्या तितक्या प्रमाणात लसीकरण झाले नसेल, तर पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारकडून लॉकडाऊनसंबंधी निर्णय घेताना तीन महत्वाच्या गोष्टींचा विचार केला जाईल. आगामी कॅबिनेट तसंच टास्क फोर्ससोबत होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होईल. यानंतरच निर्णय घेतला जाईल. गेल्या आठवड्यात लॉकडाऊनसंबंधी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन उठवू शकतो, पण लोकांना कोरोना नियमावलीचे पालन करावे लागेल, असे सूचक विधान केले होते. पण त्यांनी यावेळी परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केल्यामुळे ठाकरे सरकार काय निर्णय घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.