लवकरच केली जाऊ शकते आयपीएलच्या नव्या तारखांची घोषणा


नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामाला कोरोनामुळे ब्रेक लागला होता. बायो बबलमधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील काहींना स्पर्धा सुरू असताना कोरोनाची लागण झाल्यामुळे ही स्पर्धा बीसीसीआयने चार मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित केली होती. या स्पर्धेतील ३१ लढती अद्याप शिल्लक आहेत.

त्यानंतर आता क्रिकेट रसिकांना आयपीएलमधील ३१ लढती कधी होणार याची उत्सुकता लागली आहे. यासंदर्भात बीसीसीआय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार बीसीसीआयच्या २९ मे रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत आयपीएलच्या नव्या तारखांची घोषणा केली जाऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९ किंवा २० सप्टेंबर रोजी आयपीएलचा १४वा हंगाम पुन्हा सुरू होऊ शकतो. स्पर्धेतील शिल्लक लढती युएइमध्ये होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या देशातील क्रिकेट बोर्ड आणि आयपीएलमधील संघ यांच्याशी चर्चा सुरू आहे. बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार १० ऑक्टोबर रोजी आयपीएलची फायनल खेळवली जाऊ शकते.

१५ सप्टेंबर रोजी भारतीय संघ इंग्लंडमधून युएईमध्ये दाखल होईल. त्यानंतर ३ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी असेल. कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धा खेळून अन्य देशातील खेळाडू थेट आयपीएल खेळण्यासाठी येतील. २८ ते १९ सप्टेंबर या काळात सीबीएल होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीएल नियोजित वेळेआधी पूर्ण करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

इंग्लंड दौऱ्यातील भारताचा पहिली कसोटी सामना ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर पाचवी आणि अखेरचा कसोटी सामना १० सप्टेंबर रोजी मॅनचेस्टरमध्ये खेळवला जाईल. इंग्लंड दौरा १४ सप्टेंबर रोजी संपेल आणि भारतीय खेळाडू १५ तारखेला युएईमध्ये पोहोचतील. या नियोजनानुसार १९ किंवा २० तारखेला आयपीएलची पुन्हा सुरुवात होऊ शकेल.