नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक उद्योग धंदे बंद पडल्यामुळे कमी शिक्षित तरूण मंडळींवर आता बेरोजगारीचे संकट घोंघावत आहे. पण याच दरम्यान आता अशा बेरोजगार तरूणांना एक आशेचा किरण खुणावत आहे. भारतीय रेल्वेकडून नुकतीच एक नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. आज 25 मे पासून त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.
भारतीय रेल्वेच्या नोटिफिकेशन नुसार सध्या 3,591 जागांसाठी नोकरभरती होणार आहे. यामध्ये कारपेंटर, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर, पाईप फीटर, ड्राफ्ट्समॅन, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेटर-एसी मेकॅनिक अशा 17 विविध पदांसाठी नोकरभरती होणार आहे. दरम्यान आजपासून 24 जूनच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
दरम्यान इच्छुक उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे आयटीआयचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच 10वीत किमान 50% गुण आवश्यक आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 15-24 वर्ष आवश्यक आहे. दरम्यान जातीनुसार आरक्षण असणाऱ्यांना 5 वर्षअधिक मिळणार आहेत. 100 रूपये शुल्क अर्ज करताना भरावे लागणार आहे. तर महिला आणि एससी, एसटी, दिव्यांग यांना हे शुल्क माफ असेल. हे शुल्क ऑनलाईन अर्ज करतानाच भरावे लागणार आहे. कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत निवड प्रक्रियेसाठी नसेल. मार्कांच्या आधारेच उमेदवार निवडला जाणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण देऊन उमेदवाराला स्टायपेंट देखील दिले जाणार आहे.