येत्या 24 तासात ओडिशा-बंगालच्या किनारी धडकणार ‘यास’ चक्रीवादळ


कोलकाता : कमी दाबाचा पट्टा पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झाल्यामुळे ‘यास’ चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. यास चक्रीवादळ हे येत्या 24 तासात ओडिशा-बंगालच्या किनारी धडकणार असून त्यामुळे या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान खात्याच्या एका अंदाजानुसार, यास चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून 155-165 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या पराद्वीप आणि बंगालच्या दीघा बेटाच्या दरम्यान असलेले हे चक्रीवादळ सोमवारी सकाळी ईशान्येकडे सरकले आहे आणि मंगळवारी या दोन राज्यांच्या किनारी धडकणार आहे. किनारी प्रदेशाकडे येताना ते अधिक भीषण होणार असल्याने सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम बंगालच्या सरकारने या चक्रीवादळावर नजर ठेवण्यासाठी राज्य सचिवालयात एक नियंत्रण कक्ष उघडले आहे. या राज्याच्या किनारी जिल्ह्यांत मेदिनीपुर, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा, हावडा, हुगळी या प्रदेशात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी ओडिशा सरकारने बचाव पथकं तयार ठेवली आहेत. संवेदनशील प्रदेशातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

एनडीआरएफचे 109 पथके या दोन राज्यांमध्ये तैनात आहेत. तसेच आंध्र, तामिळनाडू अंदमान निकोबार या ठिकाणीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यास चक्रीवादळाच्या संभाव्यतेमुळे या काळात कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, तसेच किनारी भागातही राहू नये असा इशारा देण्यात आला आहे.

या आधी हवामान विभागाने सांगितले होते की, यास चक्रीवादळ ईशान्येकडे सरकणार आहे आणि 26 मे पर्यंत ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयामध्ये 25 मे पासून हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे. 22 मे रोजी पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.