कांगोमध्ये तब्बल दोन दशकांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; 15 जणांचा मृत्यू


गोमा : तब्बल दोन दशकांनंतर पूर्व कांगोमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे अनेक खेड्यांवर याचे थेट परिणाम झाले आहेत. तब्बल 500हून अधिक घरे या संकटामध्ये नष्ट झाली आहेत. तर, जवळपास 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

याबाबत युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी कांगोतील गोमा या शहरानजीक असणारा ज्वालामुखी माऊंट नीरागोंगोचा उद्रेक झाल्यामुळे जवळपास 5 हजार नागरिकांना गोमा सोडत स्थलांतरीत व्हावे लागले. तर, इतर 25 हजार नागरिकांनी येथील उत्तर पश्चिमेकडे असणाऱ्या साके शहरात शरण घेतली.

सदर संकटानंतर 170 मुले बेपत्ता असल्याचे कळते. युनिसेफच्या माहितीनुसार, या भागात अशा मुलांच्या मदतीसाठी शिबिरे लावण्यात येतील, ज्यांना कोणाचाही आधार नाही आणि या संकटाच्या कचाट्यात ते एकटे पडले आहेत. यापूर्वी या ज्वालामुखीचा 2002 मध्ये उद्रेक झाला होता. यामघ्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला होता. तर, 1 लाखाहून अधिक नागरिक बेघर झाले होते.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर लाव्हारस बाहेर पडण्यास सुरुवात झाली आणि या भागात धूर, धुळीचे साम्राज्य पाहायला मिळाले, धगधगत्या लाव्हारसाने क्षणार्धात सर्वकाही गिळंकृत करण्यास सुरुवात केली आणि जीव वाचवण्याच्या आक्रोशाने तिथे एकच गोंधळ पाहायला मिळाला.