देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचा आकडा वाढला; काल दिवसभरात 4454 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात काल दिवसभरात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण, देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा हा वाढताना दिसत आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांच्या पार पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 2,22,315 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 4454 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3,02,544 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच, 84,683 अॅक्टिव्ह रुग्ण कमी झाले आहेत.

दरम्यान देशभरात 23 मेपर्यंत 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर काल दिवसभरात 9 लाख 42 हजार 722 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत 33 कोटी 5 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 19.28 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांहून अधिक आहे.

देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.13 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 88 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 11 टक्क्यांहून कमी आली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत जगभरात भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येतही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

दरम्यान रविवारी महाराष्ट्रात 29,177 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुर्दैवाने काल 594 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचे समोर येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.

आजपर्यंत एकूण 51,40,272 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.12% एवढा झाला आहे. राज्यात आज 594 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,30,13,516 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,79,897 (16.9 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 26,96,306 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,771 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 3,48,395 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई-ठाण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक तसंच विदर्भातील नागपूर एवढ्याच जिल्ह्यात आता उपचार घेत असलेल्या म्हणजे ॲक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे. यामध्ये मुंबईत 28284 आणि ठाण्यात 24894 सक्रिय रुग्ण आहेत तर पुण्यात 51182 सक्रिय रुग्ण आहेत. साताऱ्यात 18336 तर सांगलीत 12211 आणि कोल्हापुरात 14919 आणि सोलापुरात 18487 तर नाशिकमध्ये 15946 आणि अहमदनगरमध्ये 16903 उपचार घेत असलेले रुग्ण आहेत. विदर्भात नागपूरमध्ये कोरोनावर 17635 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बाकी उर्वरीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या आत आहे. सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे तर मराठवाड्यात लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी आणि विदर्भात वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या तर पाच हजारांच्या आत आहे.