दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात!


मुंबई – राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात आले आहे. लाखो विद्यार्थी, पालक कोरोनाच्या ताणाबरोबर बोर्डाच्या परिक्षा होणार की नाही? या तणावाला सामोरे जात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत महाविकास आघाडी सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत केली आहे.

उपाध्ये यावेळी म्हणाले, राज्यात कोरोना साथीमुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे, हे जरी खरे असले तरी दीर्घकालीन कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे नुकसान होणार नाही, याची जबाबदारी सरकारची आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतरही दहावी, बारावी परीक्षांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठीही मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. मुळात ज्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या तीन तासात कोकणातील वादळ दौरा आटोपला त्या मुख्यमंत्र्यांना या परीक्षांचे महत्त्व आहे की नाही? हा देखील प्रश्न आहे.

याचबरोबर पहिला नंबर आलेल्याला तीन नापासांनी आपले मार्क एकत्र करून हरवले आणि राज्यात सरकार स्थापन केले. पण अशी लबाडी विद्यार्थ्यांसोबत करता येणार नाही. तेव्हा राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये. जर राज्य सरकार परीक्षा घेणार नसेल, तर पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे? याबाबतची स्पष्टता अजुनही सरकारने केलेली नाही.

जर सरकार परीक्षा न घेण्याचा पर्याय निवडणार असेल, तर ज्या-ज्या ठिकाणी बारावीचे गुण ग्राह्य धरले जातात, त्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांचे काय? सरकारच्या या वेळखाऊ, धोरण लकव्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याचे भान या सरकारने ठेवावे, अशी टीका देखील यावेळी केशव उपाध्येंनी केली.