यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने रद्द केल्या या 25 गाड्या


नवी दिल्ली – तोक्ते चक्रीवादळाच्या तडाक्यातून देश अद्याप सावरलेला नसतानाच आता आणखी एक भयानक यास चक्रीवादळाचे संकट पूर्व किनारपट्टीवर घोंगावत आहे. कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण झाला असून त्याचे लवकरच चक्रीवादळात रुपांतर होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

यास चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते अतितीव्र चक्रीवादळ बनेल म्हणजेच तिथे वारे ताशी 118-165 किमी वेगाने वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वादळ 26 मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, धोका लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 25 गाड्या रद्द केल्या आहेत.

काही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय भारतीय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 24 मे ते 29 मे दरम्यान चालणाऱ्या 25 रेल्वेगाड्या रद्द करण्याची घोषणा पूर्व रेल्वेने केली आहे. रेल्वे प्रशासनाने ही माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. यामध्ये बिहारच्याही काही गाड्यांचा समावेश आहे.

26 मेच्या संध्याकाळपर्यंत हे वादळ किनाऱ्याला भारताच्या पूर्व किनाऱ्याला धडकेल. बंगाल आणि उत्तर ओडिशासोबतच शेजारच्या बांगलादेशाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले होते आणि वाटेत त्याने केरळपासून अगदी उत्तर कोकणापर्यंत ठिकठिकाणी किनारी भागात मोठे नुकसान केले. किनाऱ्याला धडकल्यावरही तोक्तेचा प्रभाव राजस्थान, मध्यप्रदेशपर्यंत जाणवला होता.