नाना पटोलेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया


मुंबई – शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. दरम्यान राज्यातील सरकारमधील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन मतांतर असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. काँग्रेसचे सरकारमधील स्थान यावरुन विरोधक अनेकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतात. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातही अनेकदा शाब्दिक युद्ध रंगल्याचे पहायला मिळालं आहे. दरम्यान नाना पटोले यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

नाना पटोलेंनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचे स्थान याविषयी बोलताना सडेतोडपणे काँग्रेसची भूमिका मांडली. याआधीही अनेकदा आम्ही सांगितले आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही. तेच आमच्या नेत्यांनीही सांगितले आहे. सरकारमध्ये आमची खूप सारी भागीदारी नाही. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत आमचे नाते जोडले गेले असल्याचे ते म्हणाले आहेत.

दरम्यान नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, नाना पटोले यांना काँग्रेसशिवाय सरकार असल्याची शंका का यावी. आम्ही हे सरकार बनवताना आघाडीवर होतो. सुरुवातीपासूनच आमच्या राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धवजी किंवा अन्य नेते असतील त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीने, सहकार्यानेच चालले आहे. याचं विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेले नाही.