“नानाजी, सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय?”


मुंबई – राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घडल्या. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी राज्यात अस्तित्वात आली. सत्तेत जरी काँग्रेस सहभागी झाली असली, तरी काँग्रेस अनेक वेळा नाराजी व्यक्त करतानाही दिसली. याच मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका मुलाखतीत भाष्य केले होते. आता भाजपने नाना पटोलेंनी मांडलेल्या भूमिकेवरून नानाजी, सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय?, असे म्हणत काँग्रेसला दोन प्रश्न विचारले आहेत.

नुकतीच एक वर्तमानपत्राला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशेष मुलाखत दिली. पटोले यांनी या मुलाखतीत बोलताना देशातील व राज्यातील विविध मुद्द्यांवर राजकीय भूमिका मांडली. त्यांनी यावेळी राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारबद्दलही भाष्य केले. आमच्यामुळे हे सरकार आहे. सरकारमुळे आम्ही नसल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याच वक्तव्यावर बोट ठेवत पटोले यांना दोन प्रश्न विचारले आहेत.

याबाबत केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून, त्यात त्यांनी काँग्रेसच्या सत्तेतील स्थानाबद्दल मुद्दा उपस्थित केला. नाना पटोलेजी, तुम्ही वाफा दवडवा इतर दोन सरकार चालवित आहेत. सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय नानाजी? सरकारमध्ये कॅाग्रेसला विचारतय कोण? काँग्रेस मागण्या करते दोन्ही पक्ष लक्षही देत नाहीत. एवढंच काय…सोनिया गांधींनी पत्र लिहिले उपयोग तरी शून्य, असे म्हणत नाना पटोलेंना उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.