रिझर्व्ह बँकेने दिलेली अतिरिक्त रक्कम लसीकरणासाठी वापरा – रोहित पवार


मुंबई – कोरोनाच्या या संकटकाळात देशाला सध्या लसीकरणाची सर्वाधिक जास्त गरज असल्यामुळे आरबीआयकडून मिळालेली ९९ हजार कोटींचे अतिरिक्त रक्कम त्यासाठी वापरावे असा सल्ला ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

रोहित पवार आपल्या या ट्विटमध्ये म्हणतात, देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आणि रिझर्व बँकेकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील.


ते आपल्या पुढच्या ट्विटमध्ये कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या आर्थिक नियोजनाबद्दल बोलताना म्हणतात, राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथं कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि जीएसटीमध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण ठरवावं. असं केलं तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू.

आरबीआयने कोरोना संकटात केंद्र सरकारला खजिन्यातील ९९,१२२ कोटी रुपये वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रल बोर्डाने मोठा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारचा दिलासा मिळणार आहे. ९९,१२२ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम केंद्र सरकारला वर्ग करण्याच्या प्रस्तावाला बोर्डाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. जुलै २०२० ते मार्च २०२१ या कालावधीतील ९ महिन्यांची अतिरिक्त रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.