आता म्युकरमायकोसिसच्या लढ्यात लवकरच करतील पंतप्रधान टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा – राहुल गांधी


नवी दिल्ली – मोदी सरकारचे कुशासन म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावाला जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. या आजाराशी लढण्यासाठी आता ते लवकरच टाळ्या थाळ्या वाजवण्याची घोषणा करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

ट्विट करत मोदी सरकारवर राहुल गांधी यांनी टीकेची तोफ डागली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, फक्त भारतामध्ये कोरोनासोबतच आता ब्लॅक फंगसची नवी महामारी मोदी सिस्टीमच्या कुशासनामुळे उदयाला आली आहे. लसींचा तुटवडा तर आहेच, पण या नव्या आजारावरच्या औषधांचाही तुटवडा आता निर्माण झाला आहे. आता पंतप्रधान याविरोधात लढण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याची लवकरच घोषणा करतील.


विरोधक कोरोना परिस्थितीवरून सतत मोदी सरकारवर टीका करत आहे. देशात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून देशातील लसीकरण सुद्धा ठप्प झाले आहे. मोदींनी विदेशात लशी पाठवल्यामुळे लशीची कमतरता जाणवत असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत भारतात कोरोनाच्या रोजच्या वाढीत घट झाली आहे, पण मृत्यूची संख्या कमी होत नाही. दुसरीकडे, देशातील बरीच राज्य लशीच्या टंचाईचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीही अनेकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.