दिलासादायक; देशातील सक्रिय कोरोबाधितांच्या संख्येत घट


नवी दिल्ली : देशावर ओढावलेली कोरोना महामारीच्या दूसऱ्या लाटेवर म्हणावे तसे अद्यापही नियंत्रण मिळविण्यात यश आलेले नाही. त्यातच दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत अडीच लाखांची भर पडताना दिसत आहे. काल दिवसभरात देशात 2,57,299 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 4,194 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासात 3,57,630 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. एक लाख चार हजार 525 ने देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली आहे.

दरम्यान शुक्रवार, 21 मे पर्यंत देशात एकूण 19 कोटी 33 लाख 72 हजार 819 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, तर काल दिवसभरात 14 लाख 58 हजार 895 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत देशात 32 कोटी 64 लाखांहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1.12 टक्के एवढे आहे, तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 87 टक्के एवढे आहे. जगातील कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या आणि सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. शुक्रवारी राज्यातील 44,493 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29,644 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 50,70,801 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.7 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात शुक्रवारी 555 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,24,41,776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,27,092 (17.4 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27,94,457 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 3,67,121 सक्रिय रुग्ण आहेत.