राज्यातील वाढीव लॉकडाऊनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाष्य


रत्नागिरी – राज्यातील ठाकरे सरकारकडून कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने याआधी १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता, त्यानंतर १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी राज्य सरकारने निर्बंधदेखील कठोर केले आहेत.

दरम्यान जरी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत असली तरी काळ्या बुरशीचे संकट, लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी लागणारी तयारी यामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसंदर्भात रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्वपूर्ण भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरेंना राज्यातील कोरोना स्थितीसंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या कमी होत हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला. सध्याचा कोरोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे.

सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावे लागेल. आपल्याला सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील, असेही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाऊन वाढणार का असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीही गाफील राहू नये.