भाजपचेच काही नेते करत आहेत मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी


मुंबई – देशभरात कोट्यवधी लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचे काही घेणे देणे नाही. नरेंद्र मोदींच्या जागी नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवे होते, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे. तसेच मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचे अशी चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. पंतप्रधानपदी महाराष्ट्राचा माणूस विराजमान होत आहे, याचा आम्हाला आनंद असल्याचेही ते म्हणाले आहेत.

लसनिर्मितीसाठी नितीन गडकरी यांनी दिलेल्या सल्ल्यावर बोलताना पटोले म्हणाले की, नितीन गडकरींचे मोदींसमोर चालते की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला वाटते की नितीन गडकरी हे देशाचे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसूतक नाही. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले, लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच करत आहेत. याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत, हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे.

भाजपचेच काही नेते मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी करत आहेत. आमचा चंद्रकांत पाटलांच्या मागणीला पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

शेतक-यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण असून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतक-यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी वेग दिला आहे. दीडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतक-यांना शेती करणे परवडणार नाही व मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केल्याचा आरोप करून दोन दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

शेतकरी कोरोनाच्या संकटाने पुरता पिचला गेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला आहे. तीन काळे कृषी कायदे आणून मोदी सरकारने शेतक-यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा विडा उचलला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दीडपट वाढ हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे. दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणा-या मोदींनी हमीभावाऐवजी शेतक-यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे.

अगोदरच जनतेचे कंबरडे पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे मोडले असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतक-यांवर टाकला आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केल्याचा गाजावाजा करून दुस-या बाजूला खतांच्या किंमती वाढवून प्रत्यक्षात शेतक-यांची लूट करत उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम मोदी करत असल्याची टीका पटोले यांनी केली.