काल दिवसभरात 3,69,077 नागरिकांची कोरोनावर यशस्वीरित्या मात


नवी दिल्ली : काही केल्या देशातील कोरोनाची दुसरी लाट थांबायचे नाव घेत नाही. आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 2,76,110 कोरोनाबाधितांची भर पडली असून काल एकाच दिवसात 3874 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काल दिवसभरात 3,69,077 नागरिकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 96,841 ने कमी झाली आहे.

तर देशात बुधवार 19 मेपर्यंत 18 कोटी 70 लाख 9 हजार 792 नागरिकांना कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत. बुधवारी एकाच दिवसात देशात 11 लाख 66 हजार 90 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या. आतापर्यंत देशात 32 कोटीहून जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर काल देशात 20 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातील कोरोनाचा मृत्यू दर हा 1.11 टक्के एवढा आहे, तर रिकव्हरी रेट हा 86 टक्के आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून 13 टक्के झाली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसऱ्या क्रमांकांवर असून अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर मृतांच्या संख्येत भारताचा अमेरिका, ब्राझिलनंतर तिसरा क्रमांक लागतो.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. आज 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 49,78,937 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के एवढे झाले आहे.

आज राज्यात 594 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,18,74,364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,67,537 (17.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 30,59,095 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 23,828 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 4,01,695 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.