लसीकरणासंदर्भातील नियमावलीमध्ये केंद्र सरकारने केले महत्त्वपूर्ण बदल


नवी दिल्ली – कोरोनाचा कहर देशात कायम असून रोज लाखोंच्या संख्येने देशातील नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यातच कोरोनाची लागण लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही होत असल्यामुळे एकदा कोरोना झाल्यानंतर किती महिन्यांनी लस घ्यावी, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनीस्ट्रेशन फॉर कोविड १९ (NEGVAC) या तज्ज्ञ गटाच्या समितीने दिलेल्या सूचनांना हिरवा झेंडा दाखवला आहे. यात कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस देण्याची सूचना देण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

कोरोनाची पहिला डोस घेतल्यानंतर लागण झाल्यास दुसऱ्या डोस कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोनाची लस स्तनपान करण्याऱ्या सर्व महिलांना घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोनामुक्त व्यक्तीला अँटीबॉडी किंवा प्लाझा दिले गेले. त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या तीन महिन्यानंतर कोरोनाची लस घेण्यास सांगितले आहे. ४ ते ८ आठवडे प्रतीक्षा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच गर्भवती महिलांनी लस घ्यावी की नाही याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच याबाबत निर्णय होईल, असे सांगण्यात आले आहे.