परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी खोडून काढले केजरीवाल यांचे वक्तव्य


नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेले ट्वीट सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय झाले आहे. अरविंद केजरीवाल यांनी काल केलेल्या आपल्या आपल्या ट्वीटमध्ये सिंगापूरमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवीन स्ट्रेन लहान मुलांसाठी खूप घातक, असल्याचे ट्वीट म्हटले होते. त्यावर लगेचच सिंगापूर आरोग्य विभागाकडून आणि सिंगापूर दूतावासाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीच यावर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

ज्यांना पुरेशी माहिती असायला हवी होती, त्यांच्याकडून आलेली बेजबाबदार वक्तव्य दीर्घकाळ चालत आलेले सिंगापूरसोबतचे द्विपक्षीय संबंध बिघडवू शकतात. त्यामुळे हे मी स्पष्ट करतो की केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे मत देशाचे मत नसल्याचे म्हणत जयशंकर यांनी केजरीवाल यांचे वक्तव्य खोडून काढले आहे.


केजरीवाल यांच्या ट्वीटवर सिंगापूरने आक्षेप घेताच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सिंगापूर आणि भारत यांच्यात कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये अतिशय चांगले संबंध आहेत. आम्ही सिंगापूरकडून केल्या जाणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आणि इतर मदतीसाठी आभारी आहोत. भारताच्या मदतीसाठी लष्करी विमान पाठवण्याच्या त्यांच्या कृतीतून हेच संबंध अधोरेखित होतात. पण, ज्यांना पुरेशी माहिती असायला हवी होती, त्यांच्याकडून आलेली बेजबाबदार वक्तव्य दीर्घकाळ चालत आलेले सिंगापूरसोबतचे द्विपक्षीय संबंध बिघडवू शकतात. त्यामुळे हे मी स्पष्ट करतो की केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे मत देशाचे मत नसल्याचे जयशंकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.


दरम्यान सिंगापूर दूतावासाकडून केजरीवाल यांच्या ट्वीटवर भूमिका स्पष्ट करण्यात आली. कोरोनाचा नवीन स्ट्रेन सिंगापूरमध्ये आढळून आल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. सिंगापूरमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये आढळून आलेल्या मुलांसहित अनेक रुग्णांना बी.१.६१७.२ कोरोनाची लागण झाली आहे. हे फिलोजेनेटिक चाचणीतून सिद्ध झाले आहे. भारतातच याची निर्मिती झाली असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

त्यापाठोपाठ या नाराजीसंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीट करून माहिती दिली. आपल्या उच्चायुक्तांशी संपर्क साधून सिंगापूर सरकारने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिंगापूर स्ट्रेनबद्दलच्या विधानावर कठोर आक्षेप नोंदवला आहे. भारतीय उच्चायुक्तांनी त्यांना हे स्पष्ट केले आहे की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये कोरोना स्ट्रेन किंवा आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर बोलण्याची क्षमता नसल्याचे ट्वीट त्यांनी केले.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हा सगळा प्रकार झाल्यानंतर लगेचच यासंदर्भात केंद्र सरकारची अधिकृत भूमिका जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या चर्चेचे लाईव्ह प्रक्षेपण केल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची याआधी देखील नाचक्की झाली होती. आता पुन्हा त्यांच्यावर या ‘सिंगापूर स्ट्रेन’ प्रकरणामुळे टीका सहन करण्याची वेळ ओढवली आहे.