फडणवीस आणि माझ्याएवढा कोणताही नेता कोरोना काळात फिरला नसेल : चंद्रकांत पाटील


पुणे – कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक फिरुन काम करणाऱ्यांमध्ये स्वत:चा आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असल्याचा उल्लेख भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याएवढे काम कोरोनाच्या संपूर्ण संकटकाळात राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केले नसल्याचे आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्ही सतत फिरत आहोत. आमच्या दोघांएवढा कोणताही नेता फिरला नसेल, असे पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच कोरोनाच्या कालावधीमध्ये भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिलेला इशारा हा प्रेमळ सल्ला असल्याचेही पाटील म्हणाले आहेत. आम्हा सर्वांचे नितीनजी पालक आहेत. जशी आई मुलाला म्हणते ना संभाळून जा, गाडीतून हात बाहेर काढू नकोस, अशा भूमिकेमधून ते सांगत असतात. ते टीका करत नाही. ते फक्त काम करताना संभाळून करा असे सांगत असतात, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच आम्ही कोरोनासंदर्भातील सगळे काम संभाळून करत असल्याचेही पाटील म्हणाले. आम्ही कार्यक्रमांची संख्या देखील फार मर्यादीत ठेवली असल्याचेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांना भाजप नेत्यांकडून रसद पुरवली जात असून नागपूर कनेक्शनसंदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना, सचिन सावंत यांनी आरोप करू नयेत पुरावे द्यावेत, असे पाटील म्हणाले. तसेच अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांना नैराश्य, मानसिक संतुलन बिघडले असल्याची अशी टीका केल्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना, खरे बोलण्याचा राग चव्हाण यांना आला, असे पाटील म्हणाले.