तोक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्गातील देवगडच्या समुद्रात २ बोटींना जलसमाधी


सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी तोक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे वाहून गेल्याने बुडाल्या असून या दुर्घटनेमध्ये खलाशी राजाराम कृष्णा कदम याचा मृत्यू झाला आहे.

याबाबत देवगडचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) सुधीर पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी या बोटीच्या इंजिनामध्ये रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्याचवेळी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही बोट वाहून जाऊ लागली. त्यामुळे रुक्मिणी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी निरज यशवंत कोयंडे हे आरची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटी जवळ नेत होते.

पण, वादळी वाऱ्यामुळे आरची बोटीवरील खलाशांचे नियंत्रण सुटून दोन्ही मच्छिमार बोटी लगतच्या पालये किनाऱ्यावरील खडकावर आदळल्या. त्यानंतर दोन्ही बोटींवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण ७ खलाशी होते. यापैकी तीन खलाशी सुखरूप बाहेर आले. तर चार खलाशी वाहून गेले. यापैकी राजाराम कृष्णा कदम (रा. गढीताम्हणे, ता. देवगड) या खलाशाचा मृतदेह आज सकाळी देवगड मळई येथील खाडीमध्ये आढळून आला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांनी या दुर्घटनेनंतर बचावलेल्या खलाशांची भेट घेतली. सदरचे खलाशी हे पालये येथील सागर करंगुटकर यांच्या घरी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळाने रविवारी धुमाकूळ घातला होता. मालवण, वैभववाडी, देवगड या तालुक्यांतील किनारपट्टी भागात खवळलेला समुद्र आणि वादळी वाऱ्यांमुळे भीषण स्थिती निर्माण झाली होती. या वादळाचाच तडाखा खलाशांना बसला आहे. आनंदवाडी बंदर येथील दुर्घटनेची माहिती आज हाती आली आहे. बोटींवरील बेपत्ता खलाशांचा अद्याप शोध लागू शकलेला नाही.