मुंबई अन् गुजरातच्या दिशेने ‘तोक्ते’ चक्रीवादळाचे मार्गक्रमण


नवी दिल्ली : रविवारी केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनाऱ्यालगतच्या परिसरांत धुमाकूळ घातल्यानंतर आता तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. किनाऱ्यालगतच्या परिसरात तोक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला. याचे पडसाद कोकणातही पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी समुद्राचे पाणीही गावांत आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.

दरम्यान सुरक्षित ठिकाणी अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. आता हे चक्रीवादळ हळूहळू गुजरातच्या दिशेने सरकत आहे. चक्रीवादळ सध्या मुंबईपासून जवळपास 200 किलोमीटर आणि गुजरातपासून 400 किलोमीटर दूर आहे. मुंबई महापालिकेकडून या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना केल्या जात आहे.

त्याचबरोबर मच्छिमारांना देखील आवाहन केले जात आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील 150 मच्छिमारांच्या बोटी परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील नागरिकांची राहण्याची व्यवस्था सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे.

दरम्यान हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की, तोक्ते चक्रीवादळामुळे 17 मे रोजी मुंबईसह, उत्तर कोकण, ठाणे आणि पालघरच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये सोमवारी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसचे कर्नाटक, गोव्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळ, कर्नाटकातील काही भागांत पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारी भागांत आणि गुजरात, असम, मेघालयच्या काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार, मराठवाडाच्या काही भागांतही पावसाच्या सरी कोसळू शकतात. सिक्किम, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या काही भागांतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.