रत्नागिरीत १७ ते २३ मे दरम्यान कडकडीत लॉकडाऊन


रत्नागिरी : कोरोना प्रादुर्भावाची साखळी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तोडण्यात अद्याप यश येत नसल्यामुळे तेथील निर्बंध अजूनच कडक करण्यात येत आहेत. त्यातच आता रत्नागिरी जिल्ह्यातही लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला असून जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सदरचा आदेश दिला आहे.

अन्य संवेदनशील जिल्ह्यातून जसे की, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणाहून रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही वाहनाने प्रवेश करणाऱ्या व्यक्तींनी RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल सोबत बाळगणे आवश्यक राहील. प्रवेशाच्या ४८ तासांपूर्वीचा सदरचा अहवाल असावा किंवा mhpolice वेबसाईट कडून मिळालेला अधिकृत ई-पास वाहनासोबत ठेवणे बंधनकारक राहील. तसे कागदपत्रे नसल्यास रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत फक्त दोन व्यक्तींस ( ड्रायव्हर + क्लीनर / मदतनीस) प्रवास करण्याची परवानगी राहील. कार्गो वाहतूक ही जर राज्याबाहेरील असेल तर त्या वाहनातील कर्मचाऱ्यांनी RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवेशाच्या ४८ तासांपूर्वीचा सदर अहवाल असावा व तो ७ दिवसांकरीता वैध राहील.

लॉकडाऊन दरम्यान मेडीकल दुकाने, आरोग्य विषयक सेवा, व आरोग्य विषयक आस्थापना २४ तास कार्यरत राहतील.

रत्नागिरी जिल्ह्यात नागरी व ग्रामीण भागामध्ये नाशवंत वस्तूंमध्ये मोडणारे भाजीपाला, फळे, व दूध विक्रेत्यांची दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरु ठेवता येतील. तथापि, त्याठिकाणी सामाजिक अंतर राखणे व गर्दी टाळणे बंधनकारक राहील.

गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यास ती तात्काळ बंद करण्यात येतील. नाशवंत वस्तू जसे की, भाजीपाला, फळे, व दुध वगळून अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील. त्यांना केवळ घरपोच सेवा पुरविता येईल.

संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी (प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) सदरचा आदेश लागू राहील. यापूर्वीच्या आदेशान्वये घातलेले निर्बंध व सूट या आदेशासह कायम राहतील. सदरच्या दिनांक १७ मे रोजीचे सकाळी ७ वाजले पासून आदेशाची अंमलबजावणी दिनांक २३ मे रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.