दिलासादायक; देशातील कोरोनाबाधितांच्या आकेडवारीत होत आहे घट


नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत भलेही घट होत असली तरी मृत्यूदरात अजूनही वाढ सुरुच आहे. काल दिवसभरात देशात 3,26,098 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 3890 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी 3,53,299 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ही ताजी आकडेवारी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

दरम्यान देशात शुक्रवारपर्यंत 18 कोटी 4 लाख 57 हजार 579 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. शुक्रवारी एकाच दिवसात 11 लाख 3 हजार 625 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत 31.30 कोटीहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. शुक्रवारी 53,249 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 39,923 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण 47,07,980 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.68 टक्के एवढे झाले आहे. शुक्रवारी राज्यात 695 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,06,02,140 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5309215 (17.35 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34,82,425 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,312 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शुक्रवारी एकूण 519254 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.