लवकरच दूर होणार लसीचा तुटवडा, ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान उपलब्ध होणार 216 कोटी डोस


नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीचा देशात तुटवडा जाणवत असल्यामुळे देशातील अनेक राज्यांमधील लसीकरण मोहिम थांबवण्यात आली आहे, तर काही ठिकाणी लसीकरण मोहिम मंदावली आहे. त्यातच या तुटवड्यावर मात करण्यासाठी अनेक राज्ये ग्लोबल टेंडर काढण्याच्या तयारीत आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक बातमी आहे. कारण पाच महिन्याच्या आत लसीचा तुटवडा दूर होईलच, पण देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त, 216 कोटी डोस उपलब्ध होतील, असा दावा सरकारने केला आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्येच देशात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे समोर आले. अनेक राज्ये लसीचा अभाव असल्याचा दावा करुन केंद्र सरकारकडे लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी करत आहेत. पण आगामी काही महिन्यात लसीच्या तुटवड्यावर तोडगा निघेल, असे सरकारने म्हटले आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी कोरोना लसीबाबत ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

गुरुवारी (13 मे) दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पॉल यांनी सांगितले की, देशाकडे लसीचे 216 कोटी डोस आगामी ऑगस्टपासून डिसेंबर म्हणजेच पाच महिन्याच्या आत उपलब्ध असतील. ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत देशात लसीची उपलब्धता पाहता एकूण 216 कोटी लसीचे डोस असतील, अशी आशा आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, 216 कोटी लसींच्या डोसमध्ये 55 कोटी कोव्हॅक्सिनचे डोस, 75 कोटी कोव्हिशिल्ड, 30 कोटी बायो ई सब युनिट लस, 5 कोटी झायडस कॅडिला डीएनए, 20 कोटी नोवाव्हॅक्सिन, 10 कोटी भारत बायोटेकची नेझल व्हॅक्सिन, 6 कोटी जिनोवा आणि 15 कोटी स्फुटनिक लसीचा समावेश असेल. याशिवाय इतर परदेशी लसीही येऊ शकतात.

18 वर्षे आणि त्यावरील जास्त वयोगटाची देशात लोकसंख्या 95 कोटी आहे. सगळ्यांचे दोन्ही दोन मिळून सुमारे दोन अब्ज डोसची आवश्यकता असेल. अशातच विरोधक सातत्याने दुसऱ्या कंपन्यांना परवाना देण्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत, ज्यावर सरकार काम करण्याच्या तयारीत आहे.