तोक्ते चक्रीवादळ; रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज


मुंबई – कमी दाबाचा पट्टा दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झाला असून, चक्रीवादळात त्याचे रूपांतर होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे पुढील २४ तासांमध्ये वादळामध्ये रुपांतर होणार आहे. तोक्ते असे या वादळाचे नाव असून या वादळाचा १५,१६ आणि १७ तारखेला प्रभाव दिसेल. कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये १६ आणि १७ तारखेला या वादळाचा प्रभाव दिसेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ये यांनी दिली आहे.

शनिवार सकाळपर्यंत तोक्ते चक्रीवादळ हे त्याच भागात असेल. त्यानंतर रविवारी (१६ मे) चक्रीवादळामध्ये तीव्रता येईल. यामुळे देशाच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळात वेगाने होणारी वाढ लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) महाराष्ट्र व गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टी भागातील लोकांना १५ ते १७ मे दरम्यान सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड येथे सोमवारी मुसळधार पाऊस पडेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. या काळात येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ तोक्ते मध्ये १२ तीसात बदल होतील. त्यानंतर यामध्ये तीव्रता पाहायला मिळेल. सुरुवातीला हे चक्रीवादळ पुढे जाण्याची बरीच शक्यता आहे.

आज संध्याकाळपर्यंत उत्तर-उत्तर-पूर्वेकडे जाईल. त्यानंतर ते उत्तर-वायव्य दिशेने जाईल आणि १८ मे रोजी गुजरात किनाऱ्यावर धडकेल. शनिवारपासून रायगडमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर रविवारी आणि सोमवारी कोल्हापूर आणि सातारा येथील घाट भागात वेगळ्या ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.