अहमदाबाद – गुजरातमधील आरोग्य व्यवस्थेची कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दाणादाण उडाल्यासारखीच परिस्थिती आहे. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव केली. पण, एका गुजराती दैनिकाने केलेल्या मृत्यूंच्या पडताळणीतून हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे.
गुजरातमध्ये दररोज १,७४४ लोकांचा मृत्यू होत असून, अवघ्या ७१ दिवसात १ लाख २३ हजारांहून अधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एवढे मृत्यूप्रमाणपत्र सरकारकडून वाटण्यात आले असले, तरी राज्यात ४ हजार २१८ मृत्यू झाले असल्याचे सरकार सांगत आहे.
गुजरातमधील मृतांच्या आकडेवारीबद्दल विशेष वृत्त ‘दैनिक भास्कर’च्या गुजराती दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. राज्यात १ मार्च २०२१ ते १० मे २०२१ या कालावधी वाटप करण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आकडेवारीची पडताळणी करण्यात आली. यातून डोळे विस्फारुन टाकणारी माहिती उजेडात आली आहे.
७१ दिवसांमध्ये ३३ जिल्हे आणि ८ महापालिकांद्वारे १ लाख २३ हजार ८७१ मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तर विरोधाभास म्हणजे राज्यात केवळ ४ हजार २१८ जणांचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची सरकारी आकडेवारी सांगते. त्यामुळे गुजरातमध्ये ७१ दिवसात सव्वा लाख लोकांचा मृत्यू कशामुळे झाला, असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
मृत्यू प्रमाणपत्रांची तुलना केली, तर यावर्षी मार्च महिन्यात राज्यात २६,०२६, एप्रिलमध्ये ५७,७९६ आणि मे महिन्याच्या सुरूवातीच्या दहा दिवसात ४०,०५१ मृत्यू झाले आहेत. याची तुलना २०२० मधील आकडेवारीशी केली असता मार्च २०२० मध्ये २३,३५२, एप्रिलमध्ये २१ हजार,५९१ आणि मे महिन्यात १३,१२५ मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. यातून हेच दिसून आहे की, गेल्या वर्षीच्या तुलने यंदा मृत्यूंची संख्या दुप्पट झाली आहे.
This is terrible!! 1.23 lakh deaths in 71 days, that’s 1744 deaths per day. The much hyped Gujarat model always worked with concealing the data and fudging reports. pic.twitter.com/lsddhw0sCW
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 14, 2021
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्द्यावरून टीका केली आहे. हे भयंकर आहे! ७१ दिवसांत १.२३ लाख मृत्यू. दररोज १७,४४ मृत्यू. गुजरात मॉडेल नेहमीच माहिती लपवून ठेवत आणि अहवालात छेडछाड करण्याचेच काम करते, असे पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटले आहे.
४५ हजार २११ मृत्यू गुजरातमधील महत्त्वाच्या पाच शहरांमध्ये झाल्याची नोंद झाली आहे. या शहरांमध्ये ७१ दिवसांच्या कालावधीत ४५ हजार मृत्यू प्रमाणपत्रे दिली गेली. यात अहमदाबादमध्ये १३ हजार ५९३ मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ सुरतमध्ये ८ हजार ८५१, राजकोट १० हजार ८८७, वडोदरा ७ हजार ७२२ मृत्यू प्रमाणपत्रे दिली गेली. तर सरकारच्या आकडेवारीनुसार या शहरात झालेले मृत्यू असे आहेत.
- अहमदाबाद २ हजार १२६
- सूरत १ हजार ७४
- राजकोट २८८
- वडोदरा १८९