तिहारमधील अल-कायदाच्या दहशतवाद्याने मागितली तुरुगांतील कोरोनाबाधितांची सेवा करण्याची परवानगी


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाची लागण तरुंगांतील कैद्यांनाही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. पण तिहार तुरुंगामध्ये कैदेत असणाऱ्या एका डॉक्टरने याच रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी मागण्यासाठीचा अर्ज केला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असणाऱ्या अल कायदाचा सदस्य असून दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्याच्या आरोपांखाली हा अर्ज करणारा डॉक्टर तुरुंगामध्ये आहे.

सबील अहमद असे दिल्ली सत्र न्यायालयामध्ये अर्ज करणाऱ्या या डॉक्टरचे नाव आहे. सबीलकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उद्या १५ मे रोजी सुनावणी होणार आहे. सबील अहमदचा ब्रिटनमधील ग्लासगो विमानतळावर २००७ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. तसेच सौदी अरेबिया आणि ब्रिटनमधील दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

२२ फेब्रुवारी रोजी अहमदला दिल्लीतील विशेष पोलीस पथकाने भारत आणि परदेशातील अल कायदाच्या सदस्यांना आर्थिक व इतर मदत केल्याच्या आरोपावरून अटक केली. त्याला सध्या तिहार येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले असून आरोप निश्चिती आणि त्यांच्यावरील खटला सत्र न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या अहमदने याचिकेत कैद्यांमधील वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे तुरुंग प्रशासनाला मदत करण्याची माझी इच्छा असल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील सत्र न्यायालयात त्याने ॲड. एम. एस. खान यांच्यामार्फत अर्ज केला आहे.

रूग्णांना हाताळण्याचा व त्यांच्यावर उपचार करण्याचा आपल्या अशीलाला अनुभव असून त्याच्या या कौशल्याचा उपयोग तुरुंगातील कैद्यांसाठी होऊ शकतो, म्हणूनच कैद्यांवर उपचार करण्याची परवानगी सबीलला देण्यासंदर्भात तुरुंग अधीक्षकांना निर्देश द्यावेत, अशी विनंती खान यांनी याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे.

अहमद एमबीबीएस डॉक्टर असून त्यांच्याकडे सात वर्षांचा अनुभव असल्याचा दावाही वकिलांनी याचिकेत केला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश धर्मेंदर राणा यांच्यासमोर या याचिकेवर उद्या १५ मे रोजी सुनावणी होणार आहे. न्यायलायने यापूर्वीही अनेकदा तुरुंगामधील कोरोनाबाधितांच्या संख्येसंदर्भात अनेकदा चिंता व्यक्त केल्यामुळे या याचिकेसंदर्भात न्यायालय काय निर्णय देते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.