पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “पीएम टू डीएम मायनस सीएम”वर ममता बॅनर्जींचा आक्षेप


नवी दिल्ली : कोरोनामुळे प्रभावित झालेल्या दहा राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मे रोजी बातचीत करणार आहेत. महाराष्ट्रासह दहा राज्यातल्या 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत मोदी कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वगळून थेट जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेणार आहेत.

विविध राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये 20 मे रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे प्रभावित असलेल्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, ओदिशा आणि पुद्दुचेरीमधील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बातचीत करणार आहेत.

कोरोना परिस्थितीबाबत बोलवण्यात आलेल्या बैठकीला आता विरोध होण्याची शक्यता आहे. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वगळून थेट जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार असल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीवर आक्षेप घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची शक्यता आहे. सोबतच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही या मुद्द्यावर एकत्रित करतील, असे म्हटले जात आहे. कारण “पीएम टू डीएम मायनस सीएम” या पद्धतीचा अवलंब या बैठकीसाठी केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक का घेतली जात नाही, यावर प्रश्न उपस्थित केला जाणार आहे.