कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका


मुंबई : केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारचे अभिनेते अनुपम खेर हे कट्टर समर्थक मानले जातात. आता त्यांनी मोदी सरकारवर देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन निशाणा साधला आहे. कोरोनाच्या संकटकाळात सरकार कुठे न कुठे कमी पडले असून स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे हे महत्वाचे असल्याची टीका अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे मत अभिनेता अनुपम खेर यांनी व्यक्त केले आहे. मोदी सरकारवर अनुपम खेर यांनी केलेल्या या टीकेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचेही दिसून आले आहे.

सरकारची प्रतिमा निर्मिती करण्याचा प्रयत्न आणि काही नद्यांमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांचे प्रेत दिसत असल्यासंबंधी एक प्रश्न अनुपम खेर यांना विचारण्यात आला होता. त्यावर अनुपम खेर म्हणाले की, सरकारवर या प्रकरणात जी टीका होते आहे, ती योग्य असून या परिस्थितीत सरकारने ते काम करावे ज्यासाठी त्यांना निवडून दिले आहे.

आज जी काही परिस्थिती देशात निर्माण झाली आहे, त्यामुळे कोणालाही वेदना होऊ शकतात. देशातील नद्यांमध्ये तरंगणारी प्रेते यावरुन कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करण्याची ही वेळ नाही. देशातील एक जबाबदार नागरिक या नात्याने आपण सरकारला जाब विचारला पाहिजे, आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत.