उस्मानाबादमध्ये साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी


उस्मानाबाद : देशातील साखर कारखान्यातून ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा पहिला प्रयोग आज यशस्वी झाला आहे. रोज नव्वद ते शंभर जम्बो सिलेंडर भरतील एवढा ऑक्सिजन उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव या खाजगी साखर कारखान्यामध्ये उत्पादित होऊ लागला आहे. हे प्रमाण येत्या काही दिवसात 600 सिलेंडरपर्यंत जाईल. एखाद्या साखर कारखान्यातून ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा प्रयोग होऊ शकतो, यावर कोणालाच विश्वास नव्हता पण हे धाराशिव सारख कारखान्याने करुन दाखवले आहे.

इथेनॉल आणि अल्कोहोलची निर्मिती धाराशिव कारखान्यामध्ये होते. त्यासाठी 60 कोटी रुपये गुंतवणूक करून यंत्रणा उभारलेली आहे. हा प्रयोग पुर्वीचीच यंत्रणा वापरून करायचे ठरले. आणखी एक कोटी रुपयांची गुंतवणूक कारखान्याने यासाठी केली. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ऑक्सिजन प्लांट मौज इंजिनीयरिंगच्या धीरेंद्र ओक यांनी तयार केला आहे. यात परदेशी बनावटीचा कॉन्सन्ट्रेटर आणि जर्मनीमधून मॉलिक्युल आणावे लागले.

25 साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी, असे शरद पवार यांनी सुचवले होते. परंतु आजपर्यंत केवळ चारच साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीसाठीच्या यंत्रणेची मागणी नोंदवली आहे. इथेनॉल निर्माण करणाऱ्या कारखान्यांचे तेल कंपन्या बरोबर इथेनॉल पुरवठ्याचे करार आहेत. इतर साखर कारखानदारांना ते करार अडचणीत येतील, नुकसान होईल, अशी भीती आहे.

पंढरपूरचे तरुण उद्योजक अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर नुकसान सोसत हे पाहिले पाऊल उचलले आहे. 23 एप्रिल रोजी झूमद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची वसंतदादा इन्स्टिट्यूटने मिटींग घेतली होती. राज्यात 174 इथेनॉल निर्मिती करणारे साखर कारखाने असून आता अभिजित पाटील यांच्यानंतर इतर कारखान्याने हा प्रकल्प हातात घेतल्यास राज्यालाच नाही तर देशालाही ऑक्सिजन पुरेल एवढी क्षमता महाराष्ट्रात तयार होऊ शकणार आहे.

इथेनॉल प्रकल्प ज्या कारखान्यांकडे सुरू आहेत. अशा प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत ‘मॉलेक्युलर सिव्ह’ वापरून हवेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करता येते, हे अभिजीत पाटील यांनी लक्षात घेत आपल्या धाराशिव साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती केली आहे.