….तर मोदी सरकारला लोक कधीही माफ करणार नाहीत – नाना पटोले


मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात सध्या मोठे संकट निर्माण झालेले आहे. देशात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, दुसरीकडे लस तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरणास खंड पडत आहे. लसीचा पहिला डोस घेतलेले दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. तर, १७ टक्के लोकांचे लसीकरण झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

१७% लोकांचे लसीकरण केल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. पण लसीचे २ डोस किती लोकांना मिळाले? कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तेवढी लस भारताला दिलीच नाही, मग या एवढ्या लसी आल्या कुठून? मोदी सरकारने चूक मान्य करुन खोटारडेपणा बंद करावा, अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

तसेच, आपण पाहिले असेल की परवा केंद्र सरकारने जाहीर केले की १७ कोटी लोकांना लस दिलेली आहे. अशा पद्धतीचा एक रिपोर्ट आलेला आहे. खरंतर दोन लस दिल्यानंतर लसीकरण प्रक्रिया पूर्ण होते. आता १७ कोटीमधील किती जणांना दोनदा लस मिळाली? हा एक प्रश्न आहे आणि १७ कोटी लस ही कुठून आणली आहे. कारण, जे काही पुनावाला जाहीर करतो, त्याच्या हिशाबाने तर त्याने एवढी लस भारताला दिलेलीच नाही.

मग ही लस आली कुठून? आपल्या देशाची समजा १३० कोटी लोकसंख्या असेल, तर २६० कोटी लस आपल्याला लागणार आहे व त्यात जर वाया जाणारी संख्या पकडली तर किमान ३० कोटी लशींचे डोस आपल्या देशाला हवे आहेत. आज तेवढ्या प्रमाणात लस आपल्याजवळ उपलब्ध नाही. पूनावालानी सांगितले की आम्हाला केंद्र सरकारने २६ एप्रिलला ऑर्डर दिली आहे. म्हणजे त्यातही खोटे बोलण्याचे काम, या महामारीत तरी खरे बोला. लोकांना सांगा की आमचे चुकलेले आहे, देशाची माफी तरी मागा ते देखील नाही करत आणि उलट आपलीच पाठ थोपटायची आणि सेंट्रल व्हिस्टामध्येच आनंदी रहायचे असे, जर भाजपचे ध्येय असेल तर देशातील जनता कधीही माफ करणार नसल्याचे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राज्यात सध्या ४५ वर्षांवरील सुमारे साडेपाच लाख नागरिक केंद्राकडून अपुरा साठा मिळाल्याने कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत. या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. राज्याने १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या २ लाख ७५ हजार मात्रांचा वापर दुसरा डोस देण्यासाठीच केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी जाहीर केले आहे.