नवाब मलिक थोडे कमी बोला, तरच तुमच्या अडचणी कमी होतील; प्रवीण दरेकर


मुंबई – महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक केवळ केंद्र सरकारला टार्गेट करून आणि दुसऱ्या राज्यांतील स्वतःच्या सोयीची असलेली उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांनी जर कमी बोलले तर अडचणी कमी होतील. अशा शब्दांमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला रामभरोसे सोडले.., अशी टीका मोदी सरकारवर केली होती. तसेच, फक्त भाषणे आणि घोषणा करणे व वेळकाढूपणा करणे ही भूमिका मोदी सरकार घेत आहे. आम्हाला ऑक्सिजन मिळत नाही, रेमडीसिवीर वेळेत पुरवठा होत नाही, आता साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाही. केंद्रसरकार जाणूनबुजून अन्याय करत आहे काय, केंद्र सरकारला काम करता येत नसल्याचे देखील मलिक यांनी या अगोदर म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर नवाब मलिकांच्या या विधानांना प्रत्युतर देताना म्हणाले आहेत की, मला असे वाटते नवाब मलिक जरा कमी बोलले तर त्यांच्या अडचणी कमी होतील. त्याच्या वक्तव्यांमधून राज्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भात उपाययोजना सुचवण्याचं कधी ऐकीवात नाही. असलेल्या व्यवस्था बळकट करण्यासाठी, गतिमान करण्यासाठी काय करतो आहोत, हे कधी त्यांच्या पत्रकार परिषदेतून ऐकल्याचे मला आठवत नाही. केवळ केंद्र सरकारला लक्ष करत, दुसऱ्या राज्याची उदाहरणे देत, जी आपल्या सोयीची आहेत. या संकट काळातही आपले केवळ राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्नच नवाब मलिक यांच्या दररोजच्या पत्रकार परिषदेतून दिसतो आहे.

तसेच, इतर राज्यांचे सांगत असताना इतर राज्यांनी कोरोनाच्या या संकटात ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांचा आपल्याकडे अंमल करण्यासाठी काय केले? याचे उत्तर ते देऊ शकणार नाहीत. त्यामुळे मला वाटते की केंद्र व राज्य अशाप्रकारचे चित्र तयार करून हा वाद बंद करण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर परदेशातून मदत मिळाल्यावर टीका केली जाते. परंतु फ्रान्सच्या माध्यमातून आज कतारमधून आपल्याला नौकेतून वैद्यकीय यंत्रसामुग्री ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स येत आहेत. आज अनेक देश आपल्याला मदतीचा हात पुढे करत आहेत. जर परराष्ट्रांना आपण मदत केली नसती, तर ती मदत ही आली नसती, असेही दरेकर यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर संकट काळात तरी अशाप्रकारचा संकुचित विचार करणे योग्य नसल्याचे मला वाटते. थोडा व्यापकदृष्टीने विचार केला जावा. सुसंवादातून चांगल्या समन्वयातून सगळेजण मिळून हे सकंट दूर करूया, अशाप्रकारची त्यांच्याकडून मी नम्र अपेक्षा व्यक्त करतो. असे देखील दरेकरांनी शेवटी बोलून दाखवले.