मोठा दिलासा! राज्यातील 61,607 रुग्णांची कोरोनावर यशस्वीरित्या मात


मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेल्या निर्बंधांमुळे हा सकारात्मक परिणाम झालेला मागील काही दिवसांच्या बाधितांच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. दरम्यान राज्यात आज 61,607 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर आज 37,326 नवीन कोरोनाबाधितांचे निदान झाले आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरोनाबाधित रुग्णांचा एका दिवसातील आकडा 40 हजारांच्या खाली आला आहे.

आजपर्यंत राज्यात एकूण 44,69,425 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.97 टक्के झाले आहे. राज्यात आज 37,326 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर आज 549 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या 2,96,31,127 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 51,38,973 (17.34 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36,70,320 क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 26,664 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज रोजी राज्यात एकूण 5,90,818 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज मुंबईत 1,794 रुग्णांचे निदान झाले तर 3,580 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात 1165 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत तर एकाच दिवशी 4010 जण बरे होऊन घरी गेले आहेत. नागपूर जिल्ह्यात आज 2530 कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. (नागपूर शहर 1371, नागपूर ग्रामीण 1149). जिल्ह्यात आज कोरोनामुळे 51 मृत्यू झाले. तर आज 6,068 कोरोनामुक्त झाले आहेत.

काल रविवारी राज्यात 48,401 नवीन रुग्णांचे निदान झाले होते, तर राज्यभरात 60,226 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. तर परवा म्हणजे शनिवारी 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता, तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले होते.