खरचं लसीकरणानंतर कोरोनाची लागण होते का? यावर केंद्र सरकारनेच दिले स्पष्टीकरण


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात अक्षरशः थैमान घातलेले आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे अनेकांमध्ये जाणवू लागली आहे. दरम्यान या कोरोनाविरोधातील लढाईत आता लसीकरण मोहिमेने वेग धरला आहे. आत्तापर्यंत देशातील १३ कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु या लसीकरणानंतरही काहींना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खरच लसीकरणानंतर कोरोनाची लागण होते का ? यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

लसीकरणानंतर कोरोना होतो का? यावर भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB)ने अधिकृत ट्विटरवरून स्पष्टीकरण दिले आहे. PIB ने यावर सांगितले की, होय, लसीकरणानंतर काहींना कोरोनाची लागण होत आहे. परंतु लसीकरणानंतर फार कमी टक्के लोकांना कोरोनाची लागण होत आहे. अनेकांनाची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह येत आहे, परंतु त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याचे सरकारने म्हटले आहे.

पण कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण फार महत्त्वाचे आहे. कारण ०.०३ – ०.०४ टक्केच लोकांनाच कोरोनाची लागण होत आहे. परंतु त्यांच्यात अतिशय सौम्य लक्षणे जाणवत आहेत. परंतु लसीमुळे कोरोनाचे गंभीर परिणाम जाणवत नसल्यामुळे लस घेतल्यानंतरही नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले.

याप्रकरणी जागतिक आरोग्य संघटनेने (who) नमूद केले की, अनेक लोक कोरोना लसीकरणानंतर आजारी पडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पण केंद्राने मंजुरी दिलेल्या कोणत्याही लसीमध्ये कोरोना पसरण्यास कारणीभूत घटक नसल्यामुळे कोरोनाविरोधी लस आपल्याला कोरोनाची लागण होण्यापासून बचाव करत आहे.

लसीकरणानंतर शरीरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागतो, त्यामुळे लसीकरणानंतर आणि आधीही कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे लसीकरणानंतर आजारी पडू शकता. कारण लसी घेतल्यानंतर संरक्षण पुरविण्यासाठी पुरेसा वेळ लागत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.