काल देशभरात 3,86,444 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले असून कोरोनाचा विळखा देशाभोवती दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे. भारतात दिवसाला जवळपास 4 हजार रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच देशात पाचव्यांदा 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची देशात नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 4,03,738 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 4092 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,86,444 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी 401,078 नव्या कोरोनाबाधितांचं देशात निदान झाले होते.

दरम्यान कालपर्यंत देशातील 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. काल 20 लाख 23 हजार 532 लोकांना लसीचे डोस देण्यात आले. आतापर्यंत एकूण 30 कोटी 22 लाखांहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. एका दिवसापूर्वी 18.65 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्च करण्यात आल्या, ज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 22 टक्क्यांहून अधिक आहे.

देशातील कोरोना मृत्यूदरात वाढ झाली आहे. देशाचा मृत्यूदर 1.09 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट 82 टक्क्यांहून कमी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 17 टक्क्यांहून अधिक झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पण काल राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण काल 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 43,47,592 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.3% एवढे झाले आहे.

राज्यात काल 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, तर 864 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राने आज 75 हजार मृत्यूचा आकडा पार केला. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे.