मुंबई मॉडेलवर हसणाऱ्यांना पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांचे उत्तर


मुंबई – एप्रिलच्या सुरुवातीपासून मुंबईमध्ये वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आता झपाट्याने कमी झाली आहे. मुंबईला हे यश शहरामध्ये राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे मिळाले आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या या कामाचे कौतुक देखील केले होते.

न्या. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्लीतील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात बोलताना मुंबई महापालिकेने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मुंबई मॉडेलसारख्या इतर काही ठिकाणी सुविधा करता येऊ शकतात का हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन आमच्यावर हसवण्याचेच ठरवले असेल तर मुंबई मॉडेल आम्ही देशाला कसे समजवून सांगणार? अशी प्रतिक्रिया आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या समस्येवर प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर मुंबई मॉडेल इतर शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये राबवता येऊ शकते, असे मत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मांडले आहे.

भारतीय प्रशासनात काम करणारे मित्र दोन महिन्यांपूर्वी मला फोन करुन फक्त महाराष्ट्रातच कोरोना आहे का, असे प्रश्न विचारत हसत होते. जर एखादी व्यक्ती आपल्यावर हसत असेल तर माझी काम करण्याच्या मॉडेलबाबत मी त्यांना कसे सांगेन? जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिकण्याची वेळ नसते, तेव्हा त्या मॉडेल्सप्रमाणे काम करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नसल्याचेही आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दि इंडियन एक्स्प्रेसच्या न्यूजरूम आयडिया एक्सचेंजच्या कार्यक्रमात सांगितले.

बेड्स वाढवण्याची सक्ती कोणत्याही रुग्णालयामध्ये करू नये, असे मी दिल्ली सरकारला सांगितले आहे. ऑक्सिजनयुक्त बेड वाढवल्यामुळे रुग्णालयांकडून एसओएस कॉल वाढत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन मिळत नसल्याचे चहल यांनी सांगितले. उपलब्ध ऑक्सिजनचा योग्य उपयोग, योग्य वितरण आणि बफर स्टॉक तयार ठेवणे, यामुळे मुंबईची ऑक्सिजन समस्या आता इतिहासजमा झाल्याचे चहल म्हणाले.

मुंबईत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणताही मृत्यू झाला नसल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. पण एका मध्यरात्री आलेल्या संकटाबद्दल त्यांनी सांगितले. ऑक्सिजनच्या कमी पुरवठ्यामुळे १६ आणि १७ एप्रिलच्या मध्यरात्री सहा रुग्णालयातील १६८ रुग्णांना मुंबईच्या ‘जम्बो’ कोविड केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. त्यातील ४० रुग्णांची परिस्थिती गंभीर होती. अखेर सकाळी १ ते ५ च्या दरम्यान सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर मला १०० टक्के रुग्णांचा जीव वाचवता आला याचा आनंद असल्याचे चहल म्हणाले.

राज्याच्या टास्क फोर्ससोबत या घटनेनंतर संपर्क साधत आम्ही ऑक्सिजनच्या वापरासाठी प्रोटोकॉल ठरवण्याची विनंती केली. ऑक्सिजनचे कोणतेही प्रश्न उद्भवू नयेत यासाठी केंद्रात पोस्टिंग दरम्यान सोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत आपण दिल्लीतही याबाबत बोललो असल्याचे चहल म्हणाले. कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृहसचिव आणि आरोग्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील आठ मुख्य राजकारण्यांनाही मी याबाबत सांगितल्याचे चहल म्हणाले.

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना चहल यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर वॉर्ड वॉर रूम तयार करणे, बेडसाठी डॅशबोर्ड तयार करणे, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना तो रिपोर्ट त्याच्याकडे न देता महापालिकेला कळवणे, यासारखे उपाय केले होते. पहिल्या लाटेनंतर जम्बो कोविड सुविधा असलेले हॉस्पिटल बंद न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दुसरी लाट हाताळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे चहल यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी मुंबईत आधीच तयारी करत असल्याचे चहल यांनी सांगितले. अधिक जम्बो सुविधा असलेले जवळजवळ ५,५०० बेड्स उपलब्ध करत आहोत त्यातील ७० टक्के हे ऑक्सिजन बेड्स असतील, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त चहल यांनी दिली.