आमचे ऐकूण घेण्याऐवजी मोदींनी केली फक्त त्यांच्या ‘मन की बात’ – हेमंत सोरेन


रांची – पंतप्रधान नरेंद्र मोदींना झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. पंतप्रधानांनी आम्हाला फोन केला, पण त्यांनी आमचे ऐकूण न घेता फक्त स्वतःच्या मन की बात सांगत बसल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेमंत सोरेन आपल्या या ट्विटमध्ये म्हणतात, आज, आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. त्यांनी फक्त त्यांच्या ‘मन की बात’ केली. पण त्या ऐवजी ‘काम की बात’ केली असती आणि ऐकलीही असती तर बरे झाले असते.


झारखंड राज्यालाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संसाधनांचा तुटवडा भासत आहे. त्याचबरोबर आपल्याला अपेक्षित मदत मिळत नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. झारखंडचे आरोग्य सचिव अरुण सिंग म्हणाले की, राज्याला रेमडेसिविर इंजेक्शनच्या फक्त २,१८१ कुप्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आमच्यापर्यंत इतर कोणतीही मदत पोहोचलेली नाही. झारखंडला बांग्लादेशक़डून रेमडेसिविर इंजेक्शनच्या ५० हजार कुप्या आयात करायच्या आहेत.पण अद्यापही परवानगी मिळालेली नसल्याचे सिग यांनी म्हटले.

झारखंडमधील १.५७ कोटी लाभार्थ्यी लसीकरणासाठी पात्र आहेत. पण तिसऱ्या टप्प्यातील १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण लसींच्या तुटवड्यामुळे खोळंबले आहे. झारखंड सध्या प्रतिदिन ६८० टन ऑक्सिजन निर्माण करत आहे, पण त्यांची गरज केवळ ८० टन आहे. पण, तिथे कन्टेनर्स, सिलेंडर्स आणि वेपराईझर्सचा तुटवडा आहे. याबद्दल मुख्यमंत्री सोरेन यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याकडे मदत मागितली होती. पण ती देखील अद्याप मिळालेली नाही.