केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सागितला कोरोनाची तिसरी लाट रोखण्याचा मार्ग!


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा देशाला बसल्याचे दिसत आहे. रोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना मृतांचा आकडा देखील नियंत्रणात आणण्यात अद्याप म्हणावे तसे यश मिळालेले नाही. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी या पार्श्वभूमीवर बुधवारी देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे विधान केले होते. त्यामुळे चिंतेत अजूनच भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची तिसरी लाट आपण कशी रोखू शकतो, याविषयी मार्गदर्शन करणारी भूमिका राघवन यांनी मांडली आहे. दिल्लीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत के. विजय राघवन यांनी ही भूमिका मांडल्यामुळे केंद्र सरकार आणि देशभरातील राज्य सरकारांसाठी ही महत्त्वाची बाब ठरली आहे.

देशातील सर्व आरोग्य यंत्रणांसोबतच प्रशासकीय व्यवस्थापनाला देखील यावेळी के. राघवन यांनी सूचनावजा इशाराच दिला आहे. आपण जर कठोर पावले उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. स्थानिक, राज्य तसेच जिल्हा पातळीवर आणि शहर पातळीवर आपण कोरोनाबाबतचे नियम किंवा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर हे सर्वकाही अवलंबून असेल, असे ते म्हणाले. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे सांगतानाच या नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नवी दिल्लीमध्ये केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केले होते. कोरोनाची तिसरी लाट भारतात येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रादुर्भाव पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवे, असे ते म्हणाले होते.