पुण्यातील लॉकडाऊनवर अजित पवारांचे महत्वपूर्ण भाष्य


पुणे – मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुण्यात लॉकडाऊन लागणार की नाही यासंबंधी चर्चा सुरु असताना त्यावर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत पुण्यासह कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या इतर शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना बुधवारी केली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही खडसावले होते. अजित पवार आज पुण्यात कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी झालेल्या बैठकीत लॉकडाऊनवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

लॉकडाऊनची करण्याची गरज असल्याचे काही लोकप्रतनिधींनी सांगितले आहे. काही दुकाने सकाळी उघडी असतात. लोक वेगवेगळी कारणे देतात आणि त्यामुळे पोलिसांची अडचण होते. पण आत्ता तशाच पद्धतीने चालू ठेवून कडक निर्बंध करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी करता आली, तर निकाला चांगला मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

सध्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त दिसत आहे. पुण्यात रुग्ण थोडे कमी झाले असून राज्य सरकारला उच्च न्यायालयाने पुण्यात कडक लॉकडाऊन लागू केला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. त्यासंदर्भात मला बोलायचे नसल्याचे सांगत अजित पवारांनी भाष्य करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या सूचनेसंबंधी राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जी धावपळ दुसऱ्या लाटेत करावी लागली, ती वेळ तिसऱ्या लाटेत येऊ नये, यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा उभ्या करण्याची गरज आहे, ती कामे हातात घेतली असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. फायर ऑडिट तसेच ऑक्सिजनचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जे बारकावे लक्षात आले, त्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

राज्य सरकारच्या वतीने १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस देण्याचे ठरले होते. लसींचा पुरवठा कमी होत असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. लस देणाऱ्यांना आणि नागरिकांनाही त्रास होत आहे. येथे आल्यावर मी अदर पूनावाला यांना फोन लावला. अजून १० ते १२ दिवस ते परदेशात असतील, असे सांगण्यात आले आहे. तेथील क्रमांक मिळवू संपर्क सागंण्याचा प्रयत्न असेल, असे अजित पवार यांनी सांगितले.

४५ वरील वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस मिळण्यास उशीर होत असल्यामुळे काही नागरिकांमध्ये अस्वस्थात निर्माण झाली आहे. आम्ही यासंबंधी केंद्र सरकारशी बोलणार आहोत. मुंबईला गेल्यानंतर मी सर्वांशी बोलणार असून दुसरा डोस वेळेत देण्याची गरज असून त्याबद्दल चर्चा करणार आहे. विलंब होऊ नये यासाठी विचार करत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. बाकीच्या वर्गाला देणाऱ्या लसींसाठी परदेशातील लसींना परवानगी दिली पाहिजे. सर्वांसाठी एकच दर असावा, आम्ही अदर पूनावाला यांच्याशी चर्चा करु, असेही अजित पवार यांनी सांगितले. आपले लसीकरण करण्याआधीच दुसऱ्या देशांना पाठवली हा चुकीचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला, असा संताप देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.