विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी वर्तवली देशातील कोरोनाची लाट मे अखेरीस ओसरण्याची शक्यता


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. पहिल्या लाटेपेक्षाही ही दुसरी लाट भयंकर असल्यामुळे देशात दररोज चार लाखांच्या जवळपास नव्या कोरोनाबाधितांची भर पडताना दिसत आहे. पण मे महिन्याच्या अखेरपर्यंत या लाटेची तीव्रता कदाचित ओसरेल असे मत ख्यातनाम विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी व्यक्त केले आहे.

कदाचित मे महिन्याच्या मध्यापासून ते महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाची ही दुसरी लाट ओसरण्याची शक्यता असल्याचा आमचा अंदाज सांगत आहे, असे डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितले. यासाठी अनेक अभ्यास करण्यात आले असून काही मॉडेलच्या अभ्यासानुसार, जून महिन्याच्या सुरुवातीला ही लाट ओसरेल, असेही समोर आले आहे. या सर्वांचा एकत्रित अभ्यास करता मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट ओसरेल अशी शक्यता असल्याचेही त्या म्हणाल्या.

ख्यातनाम विषाणूतज्ज्ञ म्हणून डॉ. गगनदीप कांग या ओळखल्या जातात. जगप्रसिद्ध रॉयल सोसायटीच्या फेलोपदी निवड झालेल्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत. त्यांनी भारतात वापरण्यात येत असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींबद्दल असलेल्या अनेक शंकांचेही महिला पत्रकारांशी चर्चा करताना निरसन केले. तसेच लवकरच भारतात आणखी काही लसींचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाची लस ही नक्कीच लोकांना संरक्षित करते. ही लस एकदा घेतली की त्यामुळे पुढच्या व्यक्तीमध्ये तो पसरत नसल्यामुळे जीवाला असणार धोका कमी होतो. कोरोनाची लस ही कोरोनाचा संक्रमण थांबवते, हे नक्की असल्याचे मत डॉ. गगनदीप कांग यांनी व्यक्त केले.

देशासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे का प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, भारतात लॉकडाऊन लावल्यास त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. जर आपल्याला दोन-तीन आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी करायची असेल, त्यावर नियंत्रण आणायचे असेल तर देशात आतापासूनच लॉकडाऊन लावणे आवश्यक आहे. त्याचा परिणाम काहीच दिवसात नक्कीच दिसतील.