राज्याच्या आरोग्य विभागात तातडीने होणार 16 हजार पदांची भरती : आरोग्यमंत्री राजेश टोपे


मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यानुसार अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाचे संपूर्ण राज्यावर संकट आहे, त्यातच कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भरतीची प्रक्रिया राज्यात सुरू होणार आहे. साधारणपणे भरतीच्या प्रक्रियेचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये होत असतो. पण यावेळी भरतीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून हे भरतीचे लवकरच आदेश निघतील, अशी माहिती आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता 50 टक्के भरती करण्याच्या निर्णयाला या आधी मंजुरी देण्यात आली होती. पण राज्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबावावी, अशी मागणी केली होती. येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. ती शक्यता लक्षात घेत राज्यातील भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, त्यामुळे क आणि ड वर्गातील कर्मचारी वाढतील, अशी मागणी आरोग्य विभागाने केली होती.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्यातील आरोग्य विभागातील अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे.