शिवसेना आणि शिवसेनेच्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते – नारायण राणे


मुंबई : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी सडकून टीका आहे. महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री मराठा आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत आहे. मी शिवसेनेत अनेक वर्ष काम केले असल्यामुळे मला माहिती आहे की मराठा समाजाला शिवसेना आणि शिवसेनेच्या नेत्यांना आरक्षण द्यायचे नसल्यामुळे उद्धव ठाकरे फक्त दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे अशी भूमिका घेत आहेत. आज त्यांना मनापासून आज आनंद झाला असेल, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. मराठा समाजात मागासलेल्या लोकांप्रमाणे भारतीय घटनेनुसार आरक्षण देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, त्याचवेळी संशय आला होता. तामिळनाडू आणि कर्नाटक दोन्ही राज्यात 52 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. पण मराठा आरक्षण रद्द करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे.

आजही मराठा आरक्षणासंदर्भातील लढा संपलेला नाही. हा लढा मराठा समाज सुरु ठेवणार आहे. काही जण बाहेरुन आरक्षण देत असल्याचे दाखवत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, भारतीय राज्य घटनेनुसार आम्ही लढू आणि आरक्षण मिळवू, असे नारायण राणे यांनी म्हटले.