5G ट्रायलला दूरसंचार मंत्रालयाने दिली मंजूरी; ‘या’ कंपन्या घेणार ट्रायल


नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या दूरसंचार विभाग आणि दळणवळण मंत्रालयाने 5G ट्रायलला मंजुरी दिली असून 5G स्पेक्ट्रमचे वाटप ज्यांना करण्यात आलंे आहे, त्यांनाच ही मंजुरी मिळाली आहे. संबंधित कंपन्या या आठवड्यापासून ट्रायल्स सुरु करतील, असे वृत्त आहे.

भारतात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या खासगी टेलिकॉम कंपन्या 5Gची ट्रायल सुरु करणार आहेत. पण, ही ट्रायल किती काळ चालेल हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण सीएनबीसी 18 ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रायलमध्ये चिनी पुरवठादार सहभागी नसतील, हे स्पष्ट आहे. त्यामुळे टेलिकॉम इक्विपमेंट कंपनी हुवैई ही देखील या ट्रायलमध्ये सहभागी होणार नाही.

भारताने जेव्हा 5G रोलआऊटवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले, त्यावेळी ही घोषणा करण्यात आली आहे. भारतात काही महिन्यांपासून 5Gच्या अनुषंगाने हालचाली सुरु आहेत. परंतु, त्यास अधिकृत दुजोरा मिळण्याची आणि 5G परीक्षणासाठी स्पेक्ट्रमचे वाटप होण्याची प्रतिक्षा होती.

रिलायन्स जिओने यापूर्वीच एक स्वदेशी 5G नेटवर्क विकसित करणार असल्याच्या चर्चेस दुजोरा दिला आहे. याकरिता कंपनी मॅसिव्ह एमआयएमओ आणि 5G नेटवर्कसाठी आवश्यक स्मॉल सेल उपकरणांच्या निर्मितीवर काम करीत आहे. जिओ भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या अभियानातंर्गत ही यंत्रणा पूर्णतः मेड इन इंडिया या तत्वावर उभारत आहे.

भारती एअरटेलने जानेवारीत हैद्राबाद येथे कर्मशिअल नेटवर्कवर 5Gची तपासणी यशस्वी झाल्याचा दावा केला होता. तसेच आमचे 5G नेटवर्क तयार आहे. आता केवळ सॉफ्टवेअर अपडेट सक्षम करणे आणि स्विच बदलण्यासाठी नियामकांची मंजूरी आवश्यक असल्याचे नमूद केले होते.

तथापि 5G मोबाईल नेटवर्क चाचण्यांसाठी भारतात कोणते बॅन्ड असतील हे पाहणे आता बाकी आहे. टेलिकॉम कंपन्या लवकरच हे नेटवर्क व्यावसायिक रुपात ग्राहकांसाठी रोलआउट करण्यासाठी सज्ज होती. भारतात 5G नेटवर्क 1800 मेगाहर्टझ, 2100 मेगाहर्टझ, 2300 मेगाहर्टझसह 800 आणि 900 मेगाहर्टझ बॅण्डलाही कव्हर करेल, अशी आशा आहे. परंतु, हे बॅण्ड कंपनी निहाय वेगवेगळे असतील.

अनेक फोन कंपन्यांनी भारतात गतवर्षी 5G कनेक्टिव्हिटी असलेले मॉडेल्स लॉन्च केले आहेत. भारत सरकार देखील मेक इन इंडिया या अभियानातंर्गत भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब निर्माण करण्याच्या तयारीत आहे.

डिलाईटने मागील वर्षी आपल्या 5G द कॅटॅलिस्ट टू डिजिटल रेव्ह्युल्युशन इन इंडिया या अहवालात म्हटले होते की, 5G नेटवर्क भारतात सुरु झाल्यानंतर कारखान्यांना रिअल टाईम पुरवठादार आणि ग्राहकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. तसेच हे कारखाने अधिक कार्यक्षम होतील अशी आशा आहे. 5G नेटवर्कमुळे रिमोट मेडीसीन, स्मार्ट सिटीज, र्व्हच्युअल बॅंकींग, 4 के आणि 8 के स्ट्रिमिंग सबस्क्रिप्शन, आगमेंटेंड रिअलिटी, बिग डेटा एनालिटीक्स आणि आर्टीफिशिअल इंटेलिजन्स या क्षेत्रांना मोठा फायदा होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

5G नेटवर्कच्या स्पर्धेत भारत विकसित देशांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. गेल्यावर्षी नेटवर्क चाचणी पुरवठादार VIAVIच्या आकडेवारीनुसार, 34 देशांमधील 378 शहरांमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध आहे आणि संख्या सातत्याने वाढत आहे. त्यावेळी दक्षिण कोरियाने 85 शहरांमध्ये हे नेटवर्क सुरु केले आहे. चीनमधील 57, युएसमधील 5, युके मधील 31 शहरांमध्ये यापूर्वीच 5G नेटवर्क सेवा सुरु झालेली आहे.