कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल रद्द


नवी दिल्ली – सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले असतानाच याचा फटका आयपीएललाही बसला असून बीसीसीआयने स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना सोमवारी कोरोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला होता. दरम्यान चेन्नईच्याही तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे.

कोरोनाने बायो-बबलमध्येही घुसखोरी केल्यामुळे आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच सर्व सामने मुंबईत खेळण्याची तयारी बीसीसीआय करत होते. पण यादरम्यान हैदराबादच्या वृद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. आज दिल्लीत हैदराबाद आणि मुंबईमध्ये सामना होणार होता. खेळाडूंनाही कोरोनाची लागण होत असल्यामुळे अखेर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बुधवारी चेन्नईच्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी राजस्थानविरोधात होणारा सामना आपण खेळू शकणार नसल्याचे बीसीसीआयला कळवले होते. पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांच्या संपर्कात आलेले सर्व खेळाडू जोपर्यंत तिन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत मैदानात उतरण्यास इच्छुक नसल्याचे चेन्नई संघाने बीसीसीआयला कळवले होते. नियमाप्रमाणे यासाठी सहा दिवसांचा कालावधी लागणार होता.

आतापर्यंत आयपीएलचे २९ सामने खेळवले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आयपीएलचे उर्वरित सर्व सामने मुंबईत शिफ्ट करण्याचा विचार बीसीसीआय करत होते. मुंबईतील वानखेडे, डी वाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन मैदानांमध्ये हे सामने खेळवले जाणार होते.

दरम्यान मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असतानाच स्पर्धा रद्द करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. आयपीएल स्पर्धा कोरोना स्थितीमुळे पुढे रद्द करण्यात यावी किंवा पुढे ढकलावी, असा आदेश बीसीसीआयला द्यावा अशा मागणी याचिकेत करण्यात आली होती.

तसेच आयपीएल एवढी महत्वाची नसून खेळाडूंसाठी होणाऱ्या संसाधनांचा वापर कोरोना रुग्णांसाठी केला जाऊ शकतो, असेही याचिकाकर्त्याने म्हटले होते. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी याप्रकरणी सुनावणी होणार होती. पण त्याआधीच स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.